मुंबई : उबाठा गटाचा गल्लीत गोंधळ दिल्लीत काँग्रेससमोर मुजरा सुरु आहे, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर एक गझल शेअर करत उबाठा गटावर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी माध्यमांशी संवादही साधला.
आशिष शेलार म्हणाले की, "जबरदस्तीने खेचून राहूल गांधींच्या गळ्यात हात घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे संजय राऊत आम्ही पाहिले. आमच्याकडे लोकं आली पाहिजे, आम्ही कुणाकडे जाणार नाही म्हणत सिल्वर ओकच्या पायऱ्या झिजवताना संजय राऊतांना संपूर्ण देशाने पाहिलं. कधी ममता तर कधी केजरीवाल. त्यामुळे खरंतर मुजऱ्यांची बारात म्हणजे संजय राऊत आणि उद्धवजींची फौज आहे."
दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, "विनायक मेटे यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून महाविकास आघाडीच्या विरोधात संघर्ष केला. मराठा आरक्षणाच्या विषयातही त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यामुळे विनायक मेटेंच्या परिवारातील सदस्य त्यांनी चालवलेल्या मार्गापासून दुसरीकडे जातील असं आम्हाला वाटत नाही," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.