नवी दिल्ली : महायुतीतील मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळणार, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहे. बुधवारी नवी दिल्ली येथे भाजपची बैठक पार पडली. त्याआधी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यातील मित्रपक्षांना एक आकडी उमेदवार मिळणार ही केवळ पतंगबाजी आहे आणि अशी पतंगबाजी करणं अयोग्य आहे. आमच्या दोन्ही साथीदारांना योग्य आणि सन्मानजनक जागा देऊ. त्यामुळे माध्यमांनी स्वत:च याबद्दल ठरवणं बंद करायला हवं."
हे वाचलंत का? - "काहीजण थेट मैदानात येतील तर काही बहुरुपी, पण..."; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला
ते पुढे म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणुकीचे एकूण धोरण आणि वेळापत्रक या गोष्टींसंदर्भात प्रत्येक कोअर कमिटीसोबत केंद्रीय नेतृत्व चर्चा करत आहे. यासाठीच आता महाराष्ट्रालाही याठिकाणी बोलवलं आहे. भाजपच्या पहिल्या यादीत ज्या राज्यांमध्ये युती आहे त्यांची नावं आली नाहीत. कारण जे पक्ष युतीमध्ये असतात त्यांच्याशी चर्चा करावी लागते. त्यामुळे पहिल्या यादीत जिथे फक्त भाजप लढतो तिथल्या उमेदवारांची नावं आली आहेत," अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.