"काहीजण थेट मैदानात येतील तर काही बहुरुपी, पण..."; फडणवीसांचा कार्यकर्त्यांना सल्ला
06 Mar 2024 19:20:03
छत्रपती संभाजीनगर : काही लोकं थेट विरोधात येतील तर काही बहुरुपीदेखील येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा संपुर्ण संभाजीनगर मोदीजींच्या पाठीशी उभं करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भाजपच्या सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "काही लोकं थेट विरोधात येतील तर काही बहुरुपीदेखील येतात. हे बहुरुपी इकडे हिंदुत्वाचं नाव सांगतात आणि तिकडे कॅलेंडर छापून त्यावर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहितात. असे बहुरुपीसुद्धा मैदानात येण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आमची संस्कृती, आमचा सन्मान, देव, देश, धर्म यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून मोदीजी लढत आहेत. त्यामुळे संपुर्ण संभाजीनगर मोदीजींच्या पाठीशी उभं करा."
"औरंगाबाद जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर असं नाव द्यावं अशी घोषणा सर्वात पहिल्यांदा हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केली. परंतू, दुर्दैवाने त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष त्यांना जाग आली नाही. ज्यावेळी सरकार गेलं त्यावेळी अल्पमतात असताना त्यांनी शेवटच्या दिवसांत एक ठराव करण्याचा प्रयत्न केला. पण तो सफल झाला नाही. त्यानंतर शिंदेंजींच्या नेतृत्वात नवीन सरकार आल्यावर आम्ही औरंबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचं काम केलं. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि त्याला अमित शाहांनी मान्यता दिली. त्यांच्या सहीने हे संभाजीनगर झालं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "मागच्या लोकसभा निवडणुकीत आपण बघितलं की, चुकीच्या पद्धतीने मतदान केलं तर काय होतं. संभाजीनगरच्या खासदाराने कलम ३७० करिता हात वर केला होता का? त्यांनी राम मंदिराला समर्थन दिलं होतं का?" असे सवाल त्यांनी केले. तसेच "कलम ३७० ला विरोध करणाऱ्यांच्या यादीत संभाजीनगरच्या खासदारांचं नाव बसवलं ही आपण चुक केली. याशिवाय ज्यांना आम्ही आपलं मानत होतो तेदेखील आता त्यांच्याच रांगेत जाऊन बसले आहेत. मोदीजींना ४०० जागा तर द्यायच्याच आहेत पण माझा सवाल आहे की, या ४०० जागांमध्ये संभाजीनगरचा खासदार मोदीजींसोबत असणार आहे का? असे म्हणत यावेळी चूक करु नका," असे आवाहनही त्यांनी केले.