नवी दिल्ली. : लांगुलचालन आणि घराणेशाहीमध्ये बुडलेले इंडिया आघाडीचे नेते आता माझ्या कुटुंबास लक्ष्य करत आहेत. मात्र, १४० कोटी भारतवासी हेच माझे कुटुंब आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणा येथे केले.त्याचप्रमाणे राज्यातील सत्ताधारी द्रमुक सरकार केवळ घराणेशाहीचाच विचार करत असून राज्यातील जनतेच्या विकासाशी त्यांना कर्तव्य नसल्याचीही टिका पंतप्रधानांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तेलंगणातील आदिलाबादमध्ये ५६ हजार कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानंतर त्यांनी येथे एका सभेला संबोधित केले. ते म्हणाले, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणात बुडालेले एनडीआय आघाडीचे नेते अस्वस्थ होत आहेत. जेव्हा मी त्यांच्या कुटुंबवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो तेव्हा हे लोक आता म्हणू लागले आहेत की मोदींना कुटुंब नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की 140 कोटी देशवासी माझे कुटुंब आहेत, ज्यांचे कोणी नाही ते देखील मोदींचे आहेत आणि मोदी त्यांचे आहेत. माझा भारत हाच माझा परिवार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
तेलंगणातील जुन्या बीआरएस सरकार आणि सध्याच्या काँग्रेस सरकारवरही पंतप्रधानांनी निशाणा साधला. ते म्हणाले- टीआरएस बीआरएस झाली, पण काहीही बदलले नाही. बीआरएस सरकारने अनेक मोठे घोटाळे केले. आता काँग्रेसचे सरकार आल्यावर घोटाळ्यांची फाईल दाबून टाकली. एकत्र मिळून पैसे खाणे हेच दोन्ही पक्षांचे धोरण असल्याचाही टोला पंतप्रधानांनी लगाविला.पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी तामिळनाडूमध्ये चेन्नई येथे जाहिर सभेस संबोधित केले. ते म्हणाले, चेन्नई हे उत्साहाने भारलेले शहर असून येथे आल्यावर नवी ऊर्जा प्राप्त होते. चेन्नई हे प्रतिभा, व्यापार आणि परंपरेचे एक उत्तम केंद्र आहे. विकसित भारत घडवण्याच्या आमच्या मिशनमध्ये चेन्नईतील लोक खूप महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
१० दिवस, १२ राज्ये आणि २९ जाहिर कार्यक्रम
· 5 मार्च: संगारेड्डी, तेलंगणा येथे अनेक प्रकल्पांचे लोकार्पण – पायाभरणी व जाहिर सभा. ओडिशात जाऊन चंडीखोल, जाजपूरमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी व चांडिखोल येथे जाहीर सभा.
· 6 मार्च: कोलकाता येथे विकास प्रकल्पांचे लोकार्पण - पायाभरणी आणि बारासात येथे जाहीर सभा. यानंतर बिहारमध्ये जातील आणि बेतियामध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी.
· 7 मार्च: पंतप्रधान जम्मू-काश्मीर दौरा आणि सायंकाळी दिल्लीत एका कार्यक्रमात सहभाग.
· 8 मार्च: दिल्लीत पहिल्या राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती.
· 9 मार्च: अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग येथे सेला बोगद्याचे उद्घाटन आणि त्यानंतर इटानगरमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन. आसाममधील जोरहाट येथे प्रसिद्ध अहोम राजे लचित बोरफुकन यांच्या पुतळ्याचे अनावरण.
· 10 मार्च : उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन.
· 11 मार्च: दिल्लीतील 'नमो ड्रोन दीदी' आणि 'लखपती दीदी' कार्यक्रमाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होणार. त्यानंतर ते द्वारका एक्सप्रेसवेच्या हरियाणा विभागाचे उद्घाटन करतील. संध्याकाळी ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी होतील.
· 12 मार्च : गुजरातमधील साबरमती आणि राजस्थानमधील पोखरणला भेट देणार.
· 13 मार्च: पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरात आणि आसाममधील तीन महत्त्वाच्या सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी करतील.