नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष पशुपतीकुमार पारस यांचे बंड शमले असून आपण भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)सोबतच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पशुपती पारस यांच्या पक्षाला रालोआमध्ये जागावाटपात बिहारमध्ये एकही जागा न मिळाल्याने ते नाराज झाले होते. त्यामुळे ते लवकरच काँग्रेसप्रणित इंडी आघाडीत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.
हमारी पार्टी रालोजपा, एनडीए का अभिन्न अंग है! माननीय प्रधानमंत्री आदरणीय श्री @narendramodi जी हमारे भी नेता है और उनका निर्णय हमारे लिए सर्वोपरि है एवं उनके नेतृत्व में एनडीए पूरे देश में 400+ सीट जीतकर तीसरी बार रिकॉर्ड तोड़ बहुमत से #NDA की सरकार बनेगी..@AmitShah@JPNaddapic.twitter.com/FqyjNzxFbi
— Pashupati Kumar Paras (मोदी का परिवार) (@PashupatiParas) March 30, 2024
पशुपती पारस यांनी 'एक्स'वर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या छाचाचित्रासह एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, आमचा पक्ष आरएलजेपी रालोआचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान मोदी आमचेही नेते आहेत आणि त्यांचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रालोआ देशभरात ४०० हून अधिक जागा जिंकून तिसऱ्यांदा विक्रमी बहुमताने सरकार स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पशुपती पारस यांनी बिहारमधील सर्व चाळीस जागांवर रालोआला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पशुपती पारस हाजीरपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांचे पुतणे चिराग पासवान यांच्याविरोधात निवडणूक लढवणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दि. १९ मार्च रोजी राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष पशुपतीकुमार पारस यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मी प्रामाणिकपणे, निष्ठेने एनडीएची सेवा केली. माझ्या पक्षासोबत अन्याय झाला, असे पारस यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले होते. त्यानंतर आज दि. ३० मार्चला एनडीएत पुन्हा सहभागी होत बिहारमधील सर्व जागांवर एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.