महाकालेश्वर मंदिर अग्नितांडव प्रकरण; तपास समितीचा मोठा खुलासा
29-Mar-2024
Total Views |
भोपाळ : मध्य प्रदेशचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर मंदिराच्या (Mahakaleshwar Mandir) गर्भगृहात भस्म आरती सुरू असताना आग लागल्याची घटना सोमवार, दि. २५ मार्च रोजी सकाळी घडली. आगीत मंदिरातील पुजाऱ्यांसह १४ जण भाजले गेले. या प्रकरणाची दुर्घटनेप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने गुरुवारी अंतरिम अहवाल दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्भगृहात जादा प्रमाणात ज्वलनशील गुलाल नेण्यात आला होता, तसेच अपघातावेळी एकमेव बाहेर पडण्याचा दरवाजा १५ मिनिटांहून अधिक काळ बंद होता, गर्भगृहात पुजारी व सेवकांची जास्त उपस्थिती होती, मंदिर प्रशासनाचे अधिकारी व कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पाळण्यात झालेला निष्काळजीपणा, होळीनिमित्त जारी करण्यात आलेल्या सूचना, नियमांचे उल्लंघन, इ. गोष्टींमुळे अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील अग्निशमन तज्ज्ञ नीलेश उकांडे यांनीसुद्धा आगीच्या दुर्घटनेचे मुख्य कारण ज्वलनशील गुलालाचे प्रमाण जास्त असल्याचे मानले आहे. अद्याप नमुना अहवाल येणे बाकी आहे. महाकाल मंदिराची सुरक्षाव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी तीन सदस्यांची चार पथके काशी विश्वनाथ, तिरुपती, शिर्डी साईबाबा आणि सोमनाथ या प्रमुख मंदिरांना भेट देतील आणि विविध सणांच्या दिवशी तेथील सुरक्षा व्यवस्थेबाबत अहवाल देतील. ज्यामध्ये महाकाल मंदिरातही उपयुक्त सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.