प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू! राऊतांचा विश्वास

25 Mar 2024 11:09:53

Sanjay Raut & Prakash Ambedkar 
 
मुंबई : प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू, असा विश्वास उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. सध्या वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
संजय राऊत म्हणाले की, "शिवसेनेच्या उमेदवारांची १५ ते १६ जागांची पहिली यादी आम्ही उद्या (मंगळवारी) जाहीर करू. प्रकाश आंबेडकर नेहमीच आमच्यासोबत राहावे असं आम्हाला वाटतं. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. परंतू, आम्ही त्यांना ४ जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यांनी तो स्विकारायचा की, नाही हे त्यांच्यावर आहे."
 
"महाविकास आघाडीमध्ये जवळपास ४ ते ५ पक्ष आहेत. त्यामुळे सर्वांना आपापला वाटा मिळायला हवा. वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला असून तो योग्य आहे, असं मला वाटतं. प्रकाश आंबेडकरांनी ज्या जागा मागितल्या होत्या त्याच आम्ही त्यांना दिलेल्या आहेत. प्रकाश आंबेडकर सोबत नसतील तरीही आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या मागे जनमत आहे. प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असते तर आमचं मताधिक्य थोडं वाढलं असतं. याचा अर्थ असा नाही की, आम्ही परावलंबी आहोत. पण महाराष्ट्रातील शोषित, वंचित आणि पीडित जनतेला आमच्याबरोबर घ्यावं, अशी आमची ईच्छा आहे," असे ते म्हणाले.
 
 ते पुढे म्हणाले की, "बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत. त्यांचं संघटन मोठं आहे. आम्ही वारंवार त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना विनंती केलेली आहे. खरंतर त्यांनी आमचा हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता. तरीही आम्ही आशा सोडलेली नाही," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0