मविआने ४ जागांचा प्रस्ताव दिलेला नाही : प्रकाश आंबेडकर

23 Mar 2024 16:42:07
 
Prakash Ambedkar
 
मुंबई : महाविकास आघाडीने आम्हाला चार जागांचा प्रस्ताव दिलेला नाही, असा खुलासा वंचित बहुजन आघाजीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिल्याचे म्हटले होते. पण वंचितने हा दावा फेटाळून लावला आहे.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "आम्हाला महाविकास आघाडीने कधीही चार जागांचा प्रस्ताव दिलेला नाही. त्यांनी तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातली एक जागा अकोल्याची होती. ती जागा आम्ही त्यांना परत घेण्यास सांगितलं. त्यामुळे त्यांनी आम्हाला दोनच जागांचा प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये १५ जागांवर भाडणं आहेत. यावर त्यांचा निर्णय झाल्याशिवाय आम्ही पुढे काहीही करु शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांचं १५ जागांचं कोडं उलगडतं की, नाही हे बघण्यासाठी २६ तारखेपर्यंत थांबणार आहोत."
 
हे वाचलंत का? - "पटोले आणि वडेट्टीवार लोकसभेला घाबरले! पराभवाच्या भीतीने काढता पाय!"
 
संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, "तुम्ही आम्हाला सहकार्य केलं असतं तर इतके दिवस हे आमचं घोंगडं भिजत पडलं नसतं. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला टार्गेट केल्यामुळे त्यांना त्यांचं कोंबडं झाकता आलं. आता ते उघड पडलं आहे. त्यांचाच तिढा तुटत नसल्यास आम्ही त्यांच्यात कुठे शिरायचं? आजही त्यांचा तिढा सुटला आहे, असं आम्हाला सांगण्यात आलेलं नाही. आम्ही २६ तारखेपर्यंत वाट पाहणार असून त्यानंतर आमचा निर्णय घेणार आहोत. त्यातील आमची एक भूमिका म्हणजे काँग्रेसने आमच्या मदतीने जिंकू शकणाऱ्या सात जागा आम्हाला कळवाव्या," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "वंचिकडून शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा राहणार आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. कोल्हापूरमधून काँग्रेसकडून शाहू महाराजांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठींबा आहे," अशी घोषणाही त्यांनी केली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0