पुणे : ‘नमो महारोजगार मेळाव्या’मुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बारामती येथे दोन दिवसीय ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांसह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
या वेळी बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक, अपर पोलीस अधीक्षक, वाहतूक शाखा, बारामती पोलीस ठाणे तसेच पोलीस वसाहतींचे उद्घाटन, पोलीस वाहनांचे लोकार्पणही करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की या शासनाने ७५ हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्या तुलनेत १ लाख ६० हजार रोजगार दिले आहेत. विविध नोकर भरती सुरू असून पोलिसांची भरती, शिक्षकांची पदे भरण्यात येत आहेत. त्यात मराठा समाजाला दिलेले आरक्षणही समाविष्ट आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.याशिवाय मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून रोजगार देणारे हात निर्माण करण्याचाही शासनाचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन हा नमो महारोजगार मेळावा घेतला. तरुणाईला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संधी मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारताची अर्थव्यवस्था विस्तारत पाचव्या क्रमांकावर आणली आहे. यापुढे जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. हे उद्दीष्ट साध्य करायचे तर मानवी संसाधने विकसित करावे लागतील. तरुणांमध्ये कौशल्य विकास घडवावा लागेल. राज्याच्या अर्थसंकल्पात अजितदादांनी दोन हजार ‘प्रमोद महाजन कौशल्यविकास केंद्रे’ स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
फडणवीस म्हणाले की चांगले काम करायचे असेल तर आम्ही सगळे मिळून चांगली कामे करू शकतो, ही महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृती आहे, याचा हा मंच साक्षीदार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की बारामतीच्या वैभवात भर घालणाऱ्या चार इमारतींचे आज लोकार्पण करण्यात आले. खूप चांगल्या दर्जाची कामे झाली आहेत असे सांगून त्यांनी या कामी सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले. बारामती तालुका विकासाच्या बाबतीत नंबर एकवर नेल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.
मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की महाराष्ट्रात प्रथम नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बारामती येथील मेळाव्यात उद्योजकांनी ५५ हजारांवर रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. याठिकाणी २५४ उद्योजकांनी सहभाग घेतला,असून ३८ हजारांवर उमेदवारांनी नोंदणी केली आहे, राज्यातील महाविद्यालयात नोकरीच्या दृष्टीने ३ महिन्याचे कौशल्य विकासाचे कोर्स सुरू करण्यात येतील. उमेदवारांना नोकरी मिळण्यासाठी विभाग प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
रोजगार निर्माण करण्याची आज गरज आहे आणि महाराष्ट्र सरकारने ते देण्याविषयीचा दृष्टीकोन स्वीकारला आहे असे सांगून खासदार शरद पवार म्हणाले की मुलांच्या हाताला काम देण्यासाठी जे जे कराल त्या सगळ्या गोष्टीत आमची साथ असेल अशी खात्री देतो. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी यांनी प्रास्ताविक केले.
विमानतळासारखे बसस्थानक
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की बारामतीचे बस स्थानक एखाद्या विमानतळासारखे वाटावे असे झाले आहे, तसेच येथील पोलीस ठाणे, पोलीस उपमुख्यालय, पोलीसाकरीता इमारती या सरकारी बांधकामासारखे न दिसता या एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यालयासारखे वाटते, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.