नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू तथा खासदार गौतम गंभीर राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गंभीरने आता मोठा निर्णय घेत पुन्हा क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, गौतम गंभीरने राजकीय निवृत्तीबाबत ट्विट केले असून त्याने म्हटले आहे की, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहित यासंदर्भात विनंती केली आहे. मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी मला जनतेची सेवा करण्याची संधी दिली, असे गंभीरने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचेही निवडणुकीबाबत स्पष्टीकरण
भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग गुरुदासपूर येथून निवडणूक लढविणार आहे, असे बोलले जात होते. यावर आता युवराजने स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणाला, मी गुरुदासपूरमधून निवडणूक लढवणार नाही. दरम्यान, फाऊंडेशनच्या माध्यमातूनच लोकांना मदत करेल. तसेच, माध्यमांतून युवराजबद्दल असं सांगण्यात येत होते की भाजप त्यांना गुरुदासपूरमधून उमेदवारी देऊ शकते.