अहिल्यादेवींचे जीवन म्हणजे भारतीय इतिहासाचा सुवर्ण महोत्सव
सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचे प्रतिपादन
16-Mar-2024
Total Views | 53
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ३०० वी जयंती ३१ मे २०२४ पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने (Ahilyadevi Holkar Jayanti RSS) रा.स्व.संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी अ.भा.प्रतिनिधी सभेत संघाची भूमिका मांडली आहे.
नागपूर : "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन म्हणजे भारतीय इतिहासाचा सुवर्ण महोत्सव आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या एका सामान्य कुटुंबातील मुलीपासून ते असाधारण शासकापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास आजही प्रेरणादायी आहे. कठोर परिश्रम, साधेपणा, धर्माप्रती समर्पण, प्रशासकीय कार्यकुशलता, दूरदृष्टी आणि उज्वल चारित्र्याचे त्या एक अद्वितीय उदाहरण होते.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले.
नागपूर येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान सरकार्यवाहंनी उपस्थितीतांना संबोधित केले. रेशिमबाग येथील स्मृतीभवन परिसरात प्रतिनिधी सभा होत आहे. एकूण ४५ प्रांतांचे १५०० कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ३०० वी जयंती ३१ मे २०२४ पासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने सरकार्यवाह पुढे म्हणाले, " 'श्री शंकर आज्ञेवरुन' (श्री शंकर जींच्या आज्ञेनुसार) या राजमुद्रेने चालवले जाणारे त्यांचे शासन नेहमी भगवान शंकराचा प्रतिनिधी म्हणूनच काम करत असे. त्यांचे लोककल्याणकारी शासन हे भूमिहीन शेतकरी, जनजाती समुह आणि विधवांच्या हिताचे रक्षण करणारे एक आदर्श शासन होते. सामाजिक सुधारणा, कृषी सुधारणा, जल व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, जन कल्याण, शिक्षण यांना समर्पित असण्याबरोबरच त्यांचे शासन न्याय्यही होते. समाजातील सर्व घटकांना सन्मान, सुरक्षा आणि प्रगतीची संधी देणारी समरसतेची दृष्टी त्यांच्या प्रशासनाचा आधार होता."
पुढे ते म्हणाले, "अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ आपल्या राज्यावरच नव्हे तर संपूर्ण देशातील मंदिरांची पूजा व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिले. बद्रीनाथपासून रामेश्वरमपर्यंत आणि द्वारकापासून पुरीपर्यंत आक्रमणकर्त्यांकडून नुकसान झालेल्या मंदिरांची त्यांनी पुनर्बांधणी केली. प्राचीन काळापासून चालत आलेल्या आणि आक्रमणांदरम्यान विस्कळीत झालेल्या तीर्थक्षेत्रांना त्यांच्या कार्यांनी नवीन जागरुकता आणली. या महान कार्यांमुळे त्यांना 'पुण्यश्लोक' ही पदवी मिळाली. भारतभर पसरलेल्या या पवित्र स्थळांचा विकास हा खरे तर त्यांच्या राष्ट्रीय दूरदृष्टीचाच परिपाक आहे."
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून या उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्व स्वयंसेवक व समाज बांधवांनी उत्साहाने सहभागी व्हावे. त्यांनी दाखविलेल्या साधेपणा, चारित्र्य, धार्मिकता आणि राष्ट्रीय स्वाभिमानाच्या मार्गावर पुढे जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे मत सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केले.