मुंबई : गेल्या ५ दिवसांपासून सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप अखेर वाजले आहे. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या काळात चाललेल्या या अधिवेशनात विरोधक पुरते अपयशी ठरल्याचे पहायला मिळाले. यापुढचे पावसाळी अधिवेशन सोमवार, दि. १० जूनपासून मुंबईत होणार आहे.
अधिवेशन समाप्तीची घोषणा करताना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेचे प्रत्यक्ष कामकाज ५ दिवस (२८ तास ३२ मिनिटे) चालले. विविध कारणांनी सभागृहाचा ३१ मिनिटांचा वेळ वाया गेला. अधिवेशनकाळात दिवसाचे सरासरी कामकाज ५ तास ४२ मिनिटे मिनिटे चालले. या अधिवेशनात दोन्ही सभागृहांत ९ विधेयके संमत झाली, तर ६ विधेयके संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात आली. १ विधेयक विधानपरिषदेत प्रलंबित आहे.
आमदारांच्या उपस्थितीवर नजर
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची सर्वाधिक उपस्थिती ९१.४४ टक्के, तर सर्वात कमी उपस्थिती ५५.६४ टक्के इतकी होती. एकूण उपस्थितीचे सरासरी प्रमाण ७३.१५ टक्के इतके होते. यापुढचे अधिवेशन मुंबईमध्ये सोमवार, दि. १० जून २०२४ पासून सुरू होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.