मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह यासाठी निवडणूक आयोगाकडून निकाल दिला जाणार होता. दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे अजित पवार गटाने ट्विट करत 'आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत!' असे म्हणटले आहे.
२ जुलै २०२३ अजित पवारांनी आपल्याच काकांविरुध्दचा बंडाचं रणशिंग फुकंलं. आणि अजित पवार आपल्या ९ आमदारांसह फडणवीस- शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर शरद पवारांनी प्रेस काँन्फरन्स घेत. मी राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा आहे, असं विधान केलं. तसेच मी ही लढाई न्यायालयात लढणार नाही तर जनतेच्या न्यायालयात लढणार, असं ही शरद पवार म्हणाले. पण आता निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार गटाला जोरदार धक्का बसल्याचं बोललं जात आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आगोयाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यानंतरच अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.