मुंबई : मालिकाविश्वात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली 'रामायण' ही मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेने तीन दशकांपेक्षा अधिक काळ गाजवला आहे. नुकताच अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपन्न झाला. यावेळी रामायण मालिकेत प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारलेल्या अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लहरी या कलाकारांनी आवर्जून अयोध्येत हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना रामायण ही मालिका दुरदर्शन वाहिनीवर ५ फेब्रुवारी पासून दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम दुरदर्शनवर पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
दरम्यान, १९८७ साली दुरदर्शनवर प्रसारित झालेली रामायण ही मालिका २१ व्या शतकातील प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. डीडी नॅशनलने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत याबद्दल माहिती दिली होती. लोकप्रिय 'रामायण' ही मालिका २५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ पर्यंत दुरदर्शनवर प्रसारित झाली होती.