(Mumbai's 'DNA' is only Hindu! : Nitesh Rane)
मुंबई : "मुंबई कोणाच्या बापाची नाही. आज झालेल्या महाआरतीतून मुंबई ही हिंदूंची आहे हे दिसून आले. मुंबईचा डीएनए फक्त हिंदू!", अशा कडक शब्दांत हिंदुत्ववादी नेते आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी धर्मांधांना थेट इशारा दिला. रविवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी भुलेश्वर परिसरातील गोलदेऊळ येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने महाआरती आयोजित करण्यात आली होती. अवैध गतिविधींच्या उद्रेकाच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव या आरतीला उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत नितेश राणे यावेळी म्हणाले, "मुंबईत काही मोहल्ले आहेत जिथे पूर्वी हिंदू राहत होते. त्याच ठिकाणी सध्या धर्मांधांची संख्या वाढत चालली आहे. मोठ्या संख्येने झालेली महाआरती हा वळवळणाऱ्या हिरव्या सापांसाठी चोख संदेश आहे. आत्ता मंदिर परिसरात सभा घेत आहे, हिंदूंकडे वाकड्या नजरेने पहाल तर मोहल्यात येऊन सभा घेईन."
मुंबईतील वाढत्या लँड जिहाद प्रकरणाबाबत ते म्हणाले, "गोल देवळातील घंटानाद व आरती गेल्या वीस दिवसांपासून काही समाजकंटकांमुळे बंद ठेवण्यात आली होती. इतकच नव्हे तर मंदिर परिसरात मांस विक्रीसुद्धा सर्रासपणे होत आहेत. मग सगळेच नियम फक्त हिंदूंनाच का? पालिकेने अशा दुकानांवर वेळीच कारवाई करून लँड जिहादचे प्रकरण थांबवावे, अशी मागणी आजच्या सभेतून करीत आहे."
ज्ञानवापी व श्रीकृष्णजन्मभूमी यांच्या सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबाबत ते पुढे म्हणाले, "राज्यात हिंदुत्ववादी सरकार आलं आहे. देशाचे पंतप्रधानही हिंदुत्ववादीच आहेत. आजचा हिंदू हा झोपला नसून तो जागा झाला आहे. एक धक्का अयोध्येत मारला तर राम मंदिर उभे राहिले. अजून दोन धक्के मारायचे बाकी आहेत, तेही लवकरच बसतील. येणाऱ्या काळात हिंदुत्ववादी सरकारच येईल हे निश्चित."
उभाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता नितेश राणे यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. 'जे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण असतानाही अयोध्येत गेले नाहीत, ते हिंदूंचे कसे होतील', असे राणे यावेळी म्हणाले. महाआरती दरम्यान हजारो हिंदूंच्या उपस्थितीत हनुमान चालीसेचे पठण झाले तसेच "भारत मां के लाल है....गद्दारोंके काल है", "सारे हिंदू जागेंगे...देश विरोधी भांगेंगे" अशा घोषणाही उपस्थित हिंदू बांधवांकडून देण्यात आल्या.