मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेली सखोल स्वच्छता मोहीम ही व्यापक होत असल्याचा आनंद असल्याचे उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले. ते पुढे म्हणाले, शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा आणि या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. दरम्यान, महापालिकेच्या वतीने 'एम' पूर्व आणि 'एम' पश्चिम विभागात सखोल स्वच्छता मोहीमेत पालकमंत्री लोढा यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांनादेखील आवाहन केले.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की, मुंबईतील मोठ्या रस्त्यांची ज्याप्रमाणे व्यापक स्तरावर अत्यंत सूक्ष्म पद्धतीने स्वच्छता केली जात आहे, अगदी त्याचप्रमाणे गल्लीबोळातील रस्ते स्वच्छ करण्याची कार्यवाही यापुढे करण्यात येईल. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अभिनव मोहीम असून शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून ही मोहीम व्यापक चळवळ बनली आहे.
या स्वच्छता मोहिमेकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, सहायक आयुक्त (एम पूर्व) अलका ससाणे आणि स्थानिक मान्यवर आदी याप्रसंगी उपस्थित होते.