शिमला : हिमाचल प्रदेशातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी सुखविंदर सिंह सुक्खू सरकारमधील मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. त्यांच्या राजीनाम्यानंतर हिमाचलमधील काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग दाटू लागले आहेत.
राजीनामा देताना पत्रकार परिषद घेऊन मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्यावर आरोप केले. ते म्हणाले की, "अनेक आमदार मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. परिस्थिती सामान्य नाही. सध्या या सरकारमध्ये राहणे मला योग्य नाही. यामुळे मी राजीनामा देत आहे. मी जनतेचे आभार मानतो."
दि. २७ फेब्रुवारी २०२४ राज्यसभा निवडणुकीदरम्यानच काँग्रेसच्या सहा आमदरांनी क्रॉस वोटिंग केले होते. तेव्हापासून सुक्खू यांच्या सरकारवर संकट आलेले आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभामध्ये ६८ आमदार आहेत. ४० आमदारांसह काँग्रेस पहिल्या क्रमाकावर आहे. तर दुसऱ्या क्रमाकावर असलेल्या भाजपकडे २४ आमदार आहेत. यासह हिमाचल प्रदेशमध्ये चार अपक्ष आमदार आहेत.
काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत हिमाचलमधून एक खासदार राज्यसभेवर जाणार होता. राज्यसभा निवडणुक जिंकण्यासाठी ३५ मतांची गरज होती. काँग्रेसकडे संख्याबळ असताना सुद्धा त्यांचे अधिकृत उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला.
काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे अभिषेक मनु सिंघवी आणि भाजपच्या उमदेवार दोघांनाही ३४-३४ मत मिळाली. शेवटी लॉटरी काडून भाजपच्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. त्यातच आता विक्रमादित्य सिंह यांच्या राजीनाम्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.