“अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही लोकांना..; शेतकरी आंदोलनाबद्दल अनुपम खेर यांची स्पष्ट प्रतिक्रिया

26 Feb 2024 14:52:16

anupam kher 
 
मुंबई : अभिनेते अनुपम खेर सामाजिक, राजकीय अशा अनेक विषयांवर त्यांचे परखड मत मांडत असतात. आजवर त्यांनी बऱ्याच चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. लवकरच त्यांचा 'कागज २' चित्रपट प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना अनुपम यांनी गेला अनेक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करुन दुसऱ्यांच्या सुविधांना ठेच पोहचवू नये”,
 
अनुपम खेर म्हणाले की, "मनोरंजन विश्वातील कलाकारांचे मत कोणीही गृहीत धरत नाही. मी अनेकदा न पटणाऱ्या गोष्टींसाठी आवाज उठवला आहे. मला भेडसावणाऱ्या अन्यायाविरोधात मी वाचा फोडली आहे. पण त्यामुळे अनेक लोकांची नाराजी मी ओढवून घेतली असून मला मात्र कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. दिवसाच्या अखेरीस मात्र मला शांत झोप लागते."
 
पुढे ते म्हणाले, "सर्वांना फिरण्याचं, बोलण्याचं, अभिव्यक्त होण्याचं स्वातंंत्र्य आहे. पण यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या सुविधांना हानी पोहचवू शकत नाही. परंतु सध्या आपल्या देशात अशाच गोष्टी घडत आहेत. मला वाटत नाही संपूर्ण भारतातला शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देत असेल. शेतकरी आपल्या देशाचा अन्नादाता आहे. परंतु मला वाटतं, सामान्य लोकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत करण्यात काही अर्थ नाही."
 
 
 
Powered By Sangraha 9.0