वरळी कोणाचाही बालेकिल्ला नाही!; राहुल नार्वेकर यांनी ठणकावले

24 Feb 2024 19:54:15
Rahul Narvekar in Worli

मुंबई : 
“वरळी हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. जो काम करेल त्याचा तो बालेकिल्ला होईल. येथील लोकप्रतिनिधींनी कामे केली असती, तर आम्हाला यायची वेळ आली नसती", अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला ठणकावले आहे. शनिवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाचा दौरा करीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नार्वेकर म्हणाले, “मी लोकसभेच्या तयारी साठी येथे आलेलो नाही. 'एनडीए' ज्याला उमेदवारी देईल, त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू. त्या तयारीसाठी काही वेळ आहे. आज येथे येण्याचे तात्पर्य असे आहे, की वरळीत तीन लोकप्रतिनिधी असूनही काहीच काम होत नाही. झोपडपट्यांचा विकास होत नाही, कोळीवाड्यांच्या सीमांकनांचा प्रश्न मार्गी लागत नाही. त्यामुळे नागरिकांची घोर निराशा झाली आहे. त्यांना भाजपाच्या निमित्ताने आशेचा किरण दिसत आहे”.

केंद्रात की राज्यात?

“मुंबईकरांच्या प्रेमामुळे मला विधानसभेतील सर्वोच्च पद भूषवायची संधी मिळाली आहे. त्यामुळे वरळीकरांच्या उपयोगात येऊ शकलो, त्यांच्यासाठी काही चांगले कार्य करू शकलो, तर या विश्वासाची परतफेड होईल. म्हणूनच मी वरळीत येऊन सहाच्या सहा विभागीय कार्यालयांत जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेन. मी राज्यात काम करायचे, की केंद्रात याबाबतचा आदेश मला पक्षाकडून येईल. पक्षसंघटनेत काम करायचे असेल, तरीही मी करेन. परंतु, पक्ष जो आदेश देईल, त्याचा सन्मान केला जाईल”, असेही राहुल नार्वेकर म्हणाले.

Powered By Sangraha 9.0