"जातीनिहाय जनगणना व्हायला हवी!" छगन भूजबळांनी केली नवी मागणी

20 Feb 2024 11:09:52

Bhujbal


मुंबई :
बाठिया कमिशन किंवा शुक्रे समितीने केलेल्या जनगणनेवर आम्ही विश्वास ठेवत नाही. कोणता समाज किती आहे हे निश्चित करायचं असल्यास जातीय जनगणना करा, अशी नवी मागणी मंत्री छगन भुजबळांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. याआधी छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
छगन भुजबळ म्हणाले की, "बाठिया कमिशन किंवा शुक्रे समितीने केलेल्या जनगणनेवर आम्ही विश्वास ठेवत नाही. आम्ही ते नाकारत आहोत. तुम्हाला जर कोणता समाज किती आहे हे निश्चित करायचं असल्यास जातीय जनगणना करा. आता झारखंडसुद्धा जातिनिहाय करत आहे."
 
ते पुढे म्हणाले की, "जरांगे सांगतात तसंच सगळं करायचं असेल तर वेगळा कायदा करायची गरज काय? हा कायदा तयार करण्यामागे मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा सरकारचा स्पष्ट उद्देश दिसत आहे. गायकवाड कमिशनने दिलेल्या अहवालावर करण्यात आलेला कायदा हायकोर्टात टिकला. पण सुप्रीम कोर्टात काही त्रुटी आढळल्याने तो रद्द करण्यात आला. त्या त्रुटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न सर्व न्यायाधिशांनी मिळून केला आहे. त्यामुळे यातून मार्ग निघेल असं वाटते," असे ते म्हणाले.
 
तसेच शुक्रे समिती किंवा बाठिया कमिशन कुठल्याही समाजाचे आकडे सांगत असतील तर त्यावर कुणीही विश्वास ठेवू शकत नाही. त्यासाठी जातीनिहाय जनगणनाच करावी लागेल. कुठलाही कायदा मंजूर होत असताना कुणालाही बोलायचं असल्यास त्याला संधी द्यायला हवी," असेही भुजबळ म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0