कोलकाता : पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना येथील संदेशखळी गावातील महिलांच्या छळाच्या प्रकरणावर दि. १९ फेब्रुवारी २०२४ सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची बंगालबाहेर चौकशी व्हावी आणि पीडितांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यासोबतच राज्य पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, संपूर्ण वाद वाढत असतानाच पोलिसांनी आरोपी शिबू हाजरा याला अटक केली आहे, तर त्याच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्या संदेशखळीच्या पीडितेच्या घरावरही हल्ला करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या लोकांनी हल्ला केला त्यांनी पोलिसांचा गणवेश परिधान केला होता.
पीडितेने दंडाधिकाऱ्यांसमोर लैंगिक अत्याचाराबाबत जबाब नोंदवल्यानंतर तिच्यावर हा हल्ला झाला. आता अतिरिक्त पोलीस दल आणि प्रशासनाचे लोक या परिसरातून निघून गेल्यास आपल्यावर पुन्हा हल्ला होईल, अशी भीती पीडितेला वाटत आहे. त्यानुसार शनिवारी हल्लेखोर त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने आले होते. तसेच पीडितेच्या सासऱ्याला धमकावले.
बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जीच्या रुपात एक महिला असताना सुद्धा महिलांवर अत्याचार होत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. तर ममता बॅनर्जींनी अद्याप शाहजान खानला आरोपी मानण्यास नकार दिला आहे. त्यांनी पीडितांवर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्या असल्याचा आरोप केला आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाने स्वत: दखल घेऊन सुद्धा ममतांनी संदेशखाली येथे काहीच झालेले नाही, असे विधान केले. त्यांनी हे सगळे विरोधी पक्षांचे षडयंत्र असल्याचे वक्तव्य केले. संदेशखाळी प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.