मुंबई : "समाज कसा खुश राहील, हीच आपली विचारधारा आहे. भारत येत्या दहा वर्षांत जगाचे नेतृत्व करेल. परंतु त्यासाठी आपल्याला भारतात नेतृत्व क्षमता विकसित करावी लागेल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल यांनी केले. भारत विकास परिषदेची (भाविप) दोन दिवसीय(१७-१८ फेब्रुवारी) 'राष्ट्रीय परिषद बैठक' रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी सभागृह, केशवसृष्टी, भाईंदर पश्चिम येथे संपन्न झाली. दरम्यान भारताच्या विकासाशी संबंधित सेवा आणि मूल्यांच्या विविध पैलूंवर बैठकीत विचारमंथन करण्यात आले.
एकूण ७९ प्रांतांतील ३०० कार्यकर्ते, प्रतिनिधी बैठकीला पूर्णवेळ उपस्थित होते. भाविपच्या कार्याचा गेल्या दोन वर्षातील आढावा, तसेच पुढील दोन वर्षात काय करता येईल; अशा अनेक विषयांवर बैठकीदरम्यान चर्चा झाली. भाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष गजेंद्र सिंह संधू, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील खेड़ा, राष्ट्रीय महामंत्री श्याम शर्मा, राष्ट्रीय संगठन मंत्री सुरेश जैन, क्षेत्रीय अध्यक्ष ओमप्रकाश कानूनगो, राष्ट्रीय पर्यावरण समितिचे अध्यक्ष प्रा. प्रेमजीत दरम्यान उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष गजेंद्र सिंह संधू म्हणाले, 'आपण आज सुरक्षितही आहोत आणि स्वतंत्रही. भारत विकास परिषदेचे काम भारताचा विकास करणे आहे. पण आपण आता जगाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे, तरच आपण जागतिक नेते बनू.' राष्ट्रीय संगठन मंत्री सुरेश जैन यांनी परिषदेच्या सेवा कार्यातून लोकांच्या जीवनात परिवर्तन कसे घडवून आणता येईल, याचा विचार करून कार्यकर्त्याना सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी होण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत २०२४ ते २०२६ या वर्षासाठी भाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आदर्श कुमार गोयल, राष्ट्रीय महामंत्री दुर्गा दत्त शर्मा, राष्ट्रीय वित्त सचिव महेश बाबू गुप्ता यांची एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रीय सभेचे स्वागताध्यक्ष एस.एस.गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक यशस्वीपणे पार पडली. मुंबई प्रदेशाध्यक्ष राकेश ओस्तवाल, सचिव नरेंद्रसिंग बाबा, वित्त सचिव संजय पोदार, राष्ट्रीय उपाध्यक्ष संपत खुरदिया, क्षेत्रीय अध्यक्ष ओमप्रकाश कानूनगो, क्षेत्रीय सचिव एल आर जाजू यांसह अन्य पदाधिकाऱ्यांचे बैठकीला सहकार्य लाभले.