मुंबई : जितेंद्र आव्हाड, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे घटनातज्ञ आहेत. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी मी स्वत: ला खूप लहान समजतो, असा टोला विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी लगावला आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय देण्यात आला. यामध्ये अजित पवार यांचा पक्ष हीच खरी राष्ट्रवादी असून दोन्ही गटातील आमदारांना पात्र ठरवण्यात आले. त्यानंतर राहूल नार्वेकरांनी माध्यमांशी संवाद साधला.
राहूल नार्वेकर म्हणाले की, "जितेंद्र आव्हाड, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे घटनातज्ञ आहेत. त्यामुळे अशा विद्वानांच्या वक्तव्याला उत्तर देण्यासाठी मी स्वत: ला खूप लहान समजतो. एवढ्या महान व्यक्तींच्या वक्तव्यावर मला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही."
"सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कालमर्यादेत आम्ही निकाल दिलेला आहे. संविधानातील तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि अपात्रतेच्या संदर्भातील नियम या सगळ्यांच्या आधारावर हा निर्णय दिला गेला आहे. हा निर्णय अत्यंत सुस्पष्ट आहे. या निर्णयातील कोणतंही पाऊल हे बेकायदेशीर नाही. प्रत्येक निर्णयाचे कारण देण्यात आले आहे. त्यामुळे अशा सुस्पष्ट निर्णयाचे कोणतेही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "ज्या लोकांना १० व्या सुचीबद्दल माहिती नाही ते फक्त असेच काहीतरी वक्तव्य करु शकतात. मी दिलेला निर्णय हा संसदीय लोकशाहीला आणखी मजबुत करण्याचे काम करेल. या निर्णयात पक्षातील फुट आणि पक्षातील अंतर्गत मतभेद यामधील फरक समजावून सांगण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय पटण्यायोग्य आणि न्याय्य आहे," असेही ते म्हणाले.