घाव घाली निशाणी...

14 Feb 2024 22:22:48
shri ram


श्लोक क्र. ११६ ते १२६ या गटातील श्लोकात शेवटची ओळ ‘नुपेक्षी कदा देव भक्तीभिमानी’अशी असताना या श्लोक क्र. १२३ मध्ये मात्र ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी’ अशी घेतली आहे. कारण, देवांच्या अवतारातील रामावताराच्या पराक्रमाचे वर्णन या श्लोकात आहे आणि रामदासांना कोदंडधारी पराक्रमी रामाचे विलक्षण आकर्षण आहे.

पुराणकथांतून भगवंताचे, महाविष्णूंचे अवतार सांगितलेले आहेत. शाश्वत परब्रह्म चैतन्यरुपी भगवंताला अशाश्वत जगतातील भक्तांचा अभिमान असतो. या जगातील दुष्टांचा दुष्प्रवृत्तींचा नाश आणि भक्तांचे सज्जनांचे रक्षण यासाठी भगवंताला अवतार घेऊन या अशाश्वत जगात येऊन काम करावे लागते. या जगात दुष्ट शक्ती प्रभाव दाखवून सज्जनांवर मात करण्यासाठी क्रियाशील असतात. अहंकाराने मदोनमक्त झालेल्या दुष्ट शक्तींचा जोर वाढू लागतो. तेव्हा भगवंताला अवतार घेऊन त्या दुष्ट शक्तींना आटोक्यात आणावे लागते, प्रसंगी त्यांचा नाश करावा लागतो. असत्याचा, अधर्माचा नाश करून सत्याच्या धर्माच्या मार्गोने जाण्यासाठी देव भक्तांना मदत करीत असतो. भगवंताने जे अवतार घेतले, त्याची थोडक्यात मिंमासा पुढे करता येईल. भगवंताने मासा, कासव, वराह, नरसिंह, वामन आणि परशुराम यांचे अवतार घेऊन जे कार्य केले, त्याचा थोडक्यात परिचय आपण मागील लेखांतून करून घेतला आहे. यानंतर भगवंताचा जो सातवा अवतार कोंदडधारी दाशरथी राम याचा संदर्भ समर्थांनी यापुढील श्लोकात दिला आहे-

अहिले सतीलगि आरण्यपंथे।
कुढावा पुढें देव बंदी तयातें।
बळे सोडितां घाव घाली निशाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥१२३॥


राम हे समर्थांचे परमदैवत म्हणजे सर्वस्व आहे. भगवंताने रामावतारात भक्तांच्या उद्धारासाठी किती कष्ट सहन केले, हे सांगण्यासाठी समर्थांनी दोन प्रातिनिधिक महत्त्वाच्या कार्यांचा उल्लेख या श्लोकात केलेला आहे. सती अहिल्येचा उद्धार व रावणवध ही ती दोन महत्त्वाची कार्ये. अहिल्या उद्धाराचे कार्य हे रामाच्या आयुष्यातील सुरुवातीच्या काळातील आहे, तर रावणवध हे महत्त्वाचे कार्य पार पाडून नंतर रामांनी राज्यकारभार सांभाळला. रामाच्या वनवासकाळाच्या शेवटी रावणवध झाला आहे.स्वामींनी अहिल्येच्या कथेचा उल्लेख यापूर्वी श्लोक क्र. ३२ मध्ये केलेला आहे. राम कधीही त्याच्या दासाची उपेक्षा करीत नाही. जो रामाच्या पदी लागतो, त्याचा राम उद्धार करतो, हे सांगण्यासाठी अहिल्येचा संदर्भ तेथे आला आहे. ३२व्या श्लोकातील त्या या ओळी-

अहल्या शिळा राघवें मुक्त केली।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥

 
देव अनाथांचा कैवारी असतो, हा मुद्दा तेथे विशद केला आहे, तर प्रस्तुत १२३व्या श्लोकात रामाने भक्तांच्या उद्धारासाठी किती कष्ट सोसले, हे सांगण्यासाठी सती अहिल्येचा उल्लेख आला आहे.अहिल्येची कथा सर्वसाधारणपणे सर्वांना माहीत आहे. गौतम ऋषींची ती पत्नी तिच्या सौंदर्यावर मोहित झाल्याने इंद्राच्या मनात तिच्याविषयी आकर्षण निर्माण झाले. अहिल्या ही महान पतिव्रता व साध्वी असल्याने तिला वश करणे अशक्य आहे, हे जाणून गौतम ऋषी आश्रमात नाहीत, ही संधी साधून इंद्राने कपट करून तिच्या आश्रमात प्रवेश मिळवला. तथापि, साध्वी अहिल्या त्याला बधली नाही. गौतम ऋषींनी इंद्राला ओळखले आणि अहिल्येच्या चारित्र्यावर शंका घेऊन तिला शाप दिला. त्यामुळे ती शिळा होऊन पडली. खरा प्रकार समजल्यावर, ‘रामावतारात राम जेव्हा येथून जातील तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने तू शापमुक्त होऊन उद्धरून जाशील,’ असा गौतम ऋषींनी उःशाप दिला. रामनामाचे चिंतन करीत ती शिळावत पडून राहिली. आपल्या भक्तासाठी अनेक कष्ट सहन करून रामांनी पदस्पर्शाने तिला शापमुक्त केले. विश्वमित्रांच्याा सांगण्यावरून राम-लक्ष्मण मिथिलेला जात असताना अरण्यातून जाण्याचे कष्ट सोसून विश्वमित्रांच्या मदतीने गौतम ऋषींचा आश्रम शोधला व शिळेला पदस्पर्श करून अहिल्येला मुक्त केले. प्रात:काळी नित्यनेमाने ज्या पाच पतिव्रतांचे स्मरण केले असता महापापांचा नाश होतो, असे एका संस्कृत श्लोकात म्हटले आहे, त्यात सती अहिल्येचा उल्लेख आहे.

अहिल्या द्रौपदी सीता
तारा मंदोदरी।
पंचकन्या स्मरेत नित्यम्
महापातक नाशनम्॥

भगवंताने रामावतारात भक्तांसाठी व बंदिस्त देवांच्या मुक्तीसाठी अपार कष्ट केले आहेत. रामाचे आयुष्यच त्यासाठी होते. राम चरित्राचा विचार करताना तो पितृआज्ञा पाळणारा होता, भावंडांवर प्रेम करणारा होता, प्रजादक्ष राजा होता. एक पत्नी, एक वाणी, एक वचनी होता म्हणून त्याचे नाव पुढील वर्षानुवर्षे राहिले, असे नसून त्याने राक्षसांचा, राक्षसी प्रवृत्तींचा,महाबलाढ्य रावणाचा वध करून रावणाच्या बंदिवासातील देवांना मुक्त केले. नजरकैदेतील सीतामातेला सोडवले, म्हणून त्याचे नाव अजरामर झाले, असे सांगितले जाते. रामाचे पूजनीय स्वरूप हे कोदंडधारी राम असेच आहे.रामाच्या या कार्यासाठी रामाने कष्ट घेतले आहेत. सुरुवातीला रामांनी विश्वामित्रांच्या सांगण्यावरून ऋषीमुन्नींच्या यज्ञात विघ्न आणणार्‍या राक्षसांना ठार केले होते. शांतपणे यज्ञ करणार्‍या ऋषींना रामाने आपल्या पराक्रमाने मोठी मदत केली होती. दुष्ट राक्षसाचा सामना करून राम लक्ष्मणांनी त्यांना संपवले होते. रावणवध हे रामाच्या आयुष्यातील महान कार्य होते. ज्या रावणाला रामाने ठार केले, तो कोणी सामान्य राक्षस नव्हता.


रावण राक्षणकुळातील असला तरी मोठी तपश्चर्या करून त्याने अनेक शक्ती मिळवल्या होत्या. त्या शक्तींच्या जोरावर तो स्वतःला अजिंक्य समजत होता. त्यामुळे अनेक देवतांना त्याने बंदिस्त करून त्यांना आपल्या सेवेला लावले होते. देवतांचे सामर्थ्य तेथे चालत नसल्याने त्यांनी भगवंताला तेथून सोडवण्यासाठी प्रार्थना केली होती. दरम्यान, रावणाने राम वनवासात असताना कष्ट करून सीतेला पळवले होते. तीही रावणाच्या नजरकैदेत होती. रामाजवळ युद्धसामग्री सैन्यबळ नसताना वानरदळाच्या साह्याने अनेक अडचणींवर मात करीत रामाने रावणाबरोबर घनघोर युद्ध केले. त्यात रावणाचा वध करून त्यांच्या बंदिवासातील दैवतांची आणि सीतेची सुटका केली. आपल्या पराक्रमाने रावणावर त्याच्या निशाणावर म्हणजे सामर्थ्यावर अचूक शरसंधान करून रावणाचा वध केला. त्याने राज्य संपुष्टात आणले. पुढे ते राज्य बिभीषणाकडे सोपवले. देव भक्तीची उपेक्षा करीत नाही. भक्ताचा त्याला अभिमान असतो.येथे अभ्यासकांंच्या एक लक्षात येईल की, श्लोक क्र. ११६ ते १२६ या गटातील श्लोकात शेवटची ओळ ‘नुपेक्षी कदा देव भक्तीभिमानी’अशी असताना या श्लोक क्र. १२३ मध्ये मात्र ‘नुपेक्षी कदा राम दासाभिमानी’ अशी घेतली आहे. कारण, देवांच्या अवतारातील रामावताराच्या पराक्रमाचे वर्णन या श्लोकात आहे आणि रामदासांना कोदंडधारी पराक्रमी रामाचे विलक्षण आकर्षण आहे. या रामाने पुन्हा अवतार घेऊन तत्कालीन म्लेंच्छांची अराजकता संपवावी, असे त्यांच्या मनात होते.
 
 
सुरेश जाखडी


Powered By Sangraha 9.0