मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत विविध विषयांवर प्रयोग केले जातात. भयपट आणि विनोदीपट यांचे मिश्रण असलेल्या ‘भुल भुलैया’ चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्या अभिनयाचे प्रेक्षक चाहते झाले होते. यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग ‘भुल भुलैया २’ देखील प्रेक्षकांच्. पसंतीस आला होता, ज्यात अभिनेता कार्तिक आर्यन याने अक्षय कुमारची जागा घेतली होती. आता पुन्हा एकदा ‘भुल भुलैया ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात परत एकदा अवनी अर्थात विद्या बालन दिसणार आहे.
कार्तिक आर्यनने नुकतीच 'भूल भुलैया ३' चित्रपटाबद्दल महत्वाची घोषणा केली. यात पुन्हा एकदा विद्या बालन दिसणार असून आणखी एक सुखद धक्का म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील या चित्रपटाचा भाग होणार आहे. परंतु, ‘भुल भुलैया ३’ मध्ये देखील अक्षय कुमार दिसणार नसल्याचे स्पष्टीकरण दिग्दर्शक अनीझ बज्मी यांनी दिले आहे. तसेच, अजून एक बदल म्हणजे यात कियारा अडवाणी ऐवजी सारा अली खान दिसणार अशा देखील चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दोन भागांइतकाच ‘भुल भुलैया ३’ चित्रपटही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल अशा अपेक्षा आहे.