काँग्रेसला आपलं घर का सांभाळता येत नाही? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल

    13-Feb-2024
Total Views |

Congress


मुंबई :
काँग्रेसला घर का सांभाळता येत नाही? ज्यांनी काँग्रेसला मोठं केलं ते नेते आपल्याला का सांभाळता येत नाहीत याबद्दल आधी आत्मचिंतन केलं पाहिजे," असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. मंगळवारी काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
भाजपला पक्ष फोडल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही अशी टीका काँग्रेसकडून करण्यात येत होती. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "माझा काँग्रेस नेत्यांवर असा आरोप आहे की, त्यांना त्यांचा पक्ष आणि पक्षातील नेत्यांना सांभाळता येत नाही. त्यांना त्यांच्या पक्षात मोट बांधता येत नाही. आज हे सगळे मोठे नेते इतक्या वर्षांची त्यांची पक्षातली पुण्याई सोडून आमच्यासोबत का येत आहेत? कारण आज काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे त्यावरून पक्ष कुठल्या दिशेने चालला हेच कुणाला समजत नाही."
 
"भाजपला विरोध करता करता देशाच्या विकासाला आपण कधी विरोध करायला लागलो हेच त्यांना कळत नाहीये. त्यामुळे जेष्ठ नेते ज्यावेळी दृष्टीक्षेप टाकतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की, आपण काय करत आहोत. आपलं नेतृत्व काय करत आहे. त्यामुळे देशाच्या मुख्य धारेत जाण्यासाठी लोकं आमच्यासोबत येतात. काँग्रेसला घर का सांभाळता येत नाही, ज्यांनी काँग्रेसला मोठं केलं ते नेते आपल्याला का सांभाळता येत नाहीत याबद्दल आधी आत्मचिंतन केलं पाहिजे," असेही ते म्हणाले.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.