ललित प्रभाकर श्रीराम तर मृण्मयीने साकारली माता सीता, गीतरामायणाच्या सादरीकरणाची मुंबईकर रसिकांवर मोहिनी

01 Feb 2024 17:15:47

geetramayan 
 
मुंबई : भव्य सेट, आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई व डोळ्याचे पारणे फेडणारे महाकाव्य रामायणातील प्रसंग यांनी अक्षरशः उपस्थितांना मोहिनी घातली. सदर कार्यक्रमाच्या वेळी जय श्री राम या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. ड्रोनच्या माध्यमातून यावेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. रसिक प्रेक्षकांनी यावेळी केलेल्या जय श्री रामाच्या घोषणांनी आसमंत सुद्धा राममयी भक्तीत न्हाऊन निघाला.
 
गीत, नाट्य, नृत्य आणि वादनाच्या माध्यमातून रामायणातील एकेका प्रसंगाचे अलवारपणे सादरीकरण झाले. महाकाव्य रामायणातील एकेक प्रसंग उलगडत असतांना, रसिक श्रोते या रामायण भक्तीत तल्लीन झाले होते. दरम्यान, रामायण हे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देते. रामायणातील एकेक पात्र जीवन प्रणाली सांगणारे आहे, अशी भावना यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने महाकाव्य रामायण या कार्यक्रमाचे आयोजन गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
 
महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांनी पुन्हा एकदा ग.दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि स्व. सुधीर फडके (बाबूजी) यांच्या आवाजातून अजरामर झालेल्या गीतरामायणातील विविध प्रसंगांतील गीतांचे सादरीकरण प्रत्यक्ष अनुभवले. स्वयें श्रीराम प्रभू ऐकती, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला ग सखे, चला राघवा चला, स्वयंवर झाले सीतेचे..अशा एकेक अजरामर गीतांचे सादरीकरण यावेळी झाले त्याला रसिकांनी मनापासून दाद दिली. रामायण हे एक असे महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस यांचा परिचय देते. या महाकाव्यातील प्रसंगाचे सादरीकरण पाहण्याची संधी रसिकांना मिळाली हा एक वेगळाच आनंद होता.
 
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “४९६ वर्षांच्या प्रचंड संघर्षानंतर २२ जानेवारी रोजी श्रीरामाची अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा झाली. त्यासाठी महाराष्ट्राचे योगदान लाभले, ही भाग्याची गोष्ट. मंदिरातील महाद्वारासाठी लागणार लाकूड (काष्ठ) हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. रामायणातील जटायू हे महत्वाचे पात्र आहे. त्या जटायू संवर्धनासाठी आपण नाशिक, ताडोबा आणि पेंच येथे तीन जटायू संवर्धन केंद्रे सुरू केली आहेत. रामायणातील एकेक पात्र जीवन प्रणाली सांगणारे आहे. संकटातून सावरण्याचे बळ प्रभू श्रीराम देतात”, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 
तर आनंद माडगूळकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. गीतरामायणाच्या आठवणी खूप आहेत. दिवसेंदिवस गीतरामायणाची लोकप्रियता वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. रामायणाची तत्व आपल्या सर्वांच्या जीवनात भिनली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अभिनेत्री रवीना टंडन, अदा शर्मा, डेसी शाह, शांती प्रिय, जिया शंकर, अभिनेते अरुण गोविल, अमर उपाध्याय, शिव ठाकरे आदी कलाकार उपस्थित होते. महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेता ललित प्रभाकरने प्रभू श्रीरामांची, मृण्मयी देशपांडेने सीतामातेची, तर लक्ष्मणाची भूमिका अभिनेता शुभंकर परांजपेने साकारली होती. याशिवाय रामायणातील प्रसंग सादर करताना अभिनेता नकुल घाणेकरने रावणाची, तर अभिजीत केळकरने अग्निदेवाची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमात सगळ्याच मराठी कलाकारांनी लक्ष वेधून घेतलं होतं.
 
 
Powered By Sangraha 9.0