यवतमाळ : (CM Devendra Fadnavis) "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या घरात मुक्कामी राहिले. आम्ही जी मीठ-भाकर खातो तीच त्यांनी खाली बसून खाल्ली आणि रात्री आमच्या घरीच झोपले. सकाळी नाश्ता करून परत गेले. आज त्याला इतकी वर्षे झाली पण ती आठवण हृदयात कोरली गेली आहे. आता परत मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा घरी यावे अन् मीठ भाकर खावी ",या शब्दांत पिंपरीबुटी येथील शेतकरी विष्णू ढुमणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"आमच्या घरी जवळपास १८ तास मुख्यमंत्री मुक्कामाला होते. आपण राज्याच्या सर्वोच्च पदावर आहोत याची साधी जाणीवही त्यांनी होऊ दिली नाही. घरातील सर्वांशी आपुलकीने बोलले. भाकरी, भरीत आवडल्याचे त्यांनी आवर्जून आईला सांगितले. आमच्या घरी त्यांनी पूजाही केली होती", असेही विष्णू ढुमणे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले.
काय घडलं होतं?
२०१५ साली यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांमुळे अस्वस्थ झालेले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावात जाऊन तिथल्या लोकांसोबत राहून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी यवतमाळ तालुक्यातील ११ शेतकरी आत्महत्या झालेल्या पिंपरीबुटी गावाची निवड करण्यात आली होती.
याच गावातील शेतकरी विष्णू ढुमणे यांच्या घरी जेवण आणि विश्रांती करिता मुक्कामी राहणार असे ठरले. घरी मुख्यमंत्री येणार असल्याचा निरोप ढुमणे कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. १ मार्च २०१५ अशी तारीख ठरली. गावातील शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर फडणवीस त्यांच्या घरी आले. त्यांच्यासोबत तत्कालीन आमदार मदन येरावार, संजय राठोड, अशोक उईके सोबत होते. विष्णू यांची आई लिलाबाई यांनी जेवणासाठी भरीत आणि भाकरीचा बेत केला होता. सगळ्यांनी ढुमणे यांच्या घरी जेवण केले. रात्री इतर सारे निघून गेले. मात्र देवेंद्र फडणवीस हे ढुमणे यांच्या घरीच एका खाटेवर झोपले होते.