चीनसोबत संबंध सुधारण्यास प्रारंभ, भारतीय लष्कराचा सिंहाचा वाटा

04 Dec 2024 11:56:51
Jayshankar

नवी दिल्ली : लोकसभेत चीनच्या ( China ) मुद्द्यावर बोलताना परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, “एलएसी’वरील परिस्थिती आता सामान्य आहे. दोन्ही देश परिस्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध आहेत,” असे त्यांनी सांगितले. ‘एलएसी’वरील शांतता राखण्याचे श्रेय परराष्ट्रमंत्र्यांनी लष्कराला दिले.

भारत-चीन संबंधांविषयी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी लोकसभेत निवेदन केले. यावेळी ते म्हणाले, “सध्या ‘एलएसी’वरील परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे. भारत आणि चीन यांच्यातील चर्चेच्या अनेक फेर्‍यांनंतर दोन्ही बाजूंनी या स्थितीत कोणताही एकतर्फी बदल केला जाणार नाही, यावर सहमती दर्शवली आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी ‘एलएसी’वर शांतता प्रस्थापित करण्याचे श्रेय भारतीय लष्कराला दिले. सीमेवर स्थैर्य राखण्यात आपल्या सैनिकांच्या निर्धाराने महत्त्वाची भूमिका बजावली,” असे ते म्हणाले.

सीमेवरील शांतता आणि स्थैर्य ही भारत-चीन संबंधांची पूर्वअट आहे, यावर परराष्ट्रमंत्र्यांनी भर दिला. “सीमा व्यवस्थापनाबाबत भारत आणि चीनमध्ये झालेल्या जुन्या करारांची अंमलबजावणी केली जात आहे. सीमेवरील परिस्थितीमध्ये कोणताही गडबड होणार नाही, यावर दोन्ही देशांनी एकमत केले आहे. दोन्ही देश संवाद आणि सहमतीच्या आधारेच सर्व प्रश्न सोडवतील.

सीमेवर परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच भारत आणि चीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा शक्य होईल,” असेही परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. “सीमावादामुळे भारत आणि चीनमधील व्यापार आणि सामरिक भागीदारीवर परिणाम झाला आहे. दोन्ही देश आशियातील प्रमुख आर्थिक शक्ती आहेत. परंतु, त्यांच्यातील तणावाचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवरही होतो. केवळ भारत आणि चीनच्याच नव्हे, तर संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्यासाठी सीमाविवादाचे निराकरण महत्त्वाचे आहे. हा वाद मिटला, तर ते आशियातील चिरस्थायी शांततेच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल,” असेही परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे.

Powered By Sangraha 9.0