१०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देणार

31 Dec 2024 18:03:58
 
GHARKUL
 
मुंबई : (Gharkul Yojana) येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी, या योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी १०० दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी सांगितले.
 
ग्रामविकास मंत्री गोरे मंत्रालयात मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार सचिन कांबळे-पाटील, मंत्री गोरे यांच्या पत्नी सानिया गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाल्याने मंत्रीपदाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासविषयक विविध संकल्पना राबवून विभागाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
 
१०० दिवसांचा कार्यक्रम समोर ठेवून काम करणार असून राज्याला प्रथमच २० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. १०० दिवसात या घरांना मान्यता देवून कामे चालू करण्यात येतील. तसेच प्रधानमंत्री यांची महत्वाकांक्षी लखपती दीदी योजना १०० दिवसात राबविण्याचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी ५० लाख अतिरिक्त लखपती दीदी करणार असल्याचेही गोरे यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0