बीड : बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाने रद्द करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सोमवार, ३० डिसेंबर रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुरेश धस म्हणाले की, "बीड जिल्ह्यात ज्या लोकांना भाजीपाल्यासारखे अग्निशस्त्र परवाने वाटलेले आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. १०५ परवाने रद्द झाले असून आणखी १२ ते १५ परवाने बँकांशी संबंधित आहेत. राहिलेल्या एक हजार परवान्यांची माहिती घेऊन लवकरात लवकर रद्द करण्याचे आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे."
हे वाचलंत का? - चिपळूणमध्ये मनसेला धक्का! शहराध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा
"तसेच ज्या एसपींच्या कालावधीत जास्तीत जास्त परवाने दिले गेलेत त्यांच्या नावाची यादी मी मागितली आहे. कुणीही उठतो आणि परवाने काढतो आहे. लग्नात गेल्यावर बंदूक वर करून दाखवतो. बीड जिल्ह्यातील या प्रकारावर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढच्या आठ ते पंधरा दिवसांच्या आत कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये. ज्या लोकप्रतिनिधींनी शिफारसी केल्या असतील किंवा ज्यांनी आपले पद भाड्याने दिले असेल तर त्या शिफारसीसुद्धा तपासण्यात याव्या," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "प्राजक्ता माळीचा विषय संपला आहे. जे काही झाले त्याला सामोरे जायला मी तयार आहे. अनेकांनी माझी बाजू मांडली आहे. कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यात झालेले जंगलराज याचा फोकस दुसरीकडे वळवू नका. या प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत गतीने यंत्रणा कामाला लावली आहे. आका आणि त्यांच्या आकामध्ये हजर व्हावे की, नाही असे द्वंद्व सुरु आहे," असेही ते म्हणाले.