अटल बिहारी वाजपेयींच्या १००व्या जयंतीनिमित्त केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी

25 Dec 2024 18:31:29
Narendra Modi

भोपाळ : देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केन- बेटवा ( Ken Betwa ) या नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी केली. राष्ट्रीय दृष्टीकोन योजनेअंतर्गत हा देशातील पहिला नदी जोडणारा प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. २५ डिसेंबर रोजी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथे पोहोचले. त्यांनी तेथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले व पायाभरणीही केली.

केन-बेटवा लिंक प्रकल्पांतर्गत मध्य प्रदेशातील केन नदीचे पाणी उत्तर प्रदेशातील बेटवा नदीमध्ये पाठवले जाणार आहे. केन नदी ही जबलपूरजवळील कैमूर पर्वतरांगांमधून उगम पावते आणि पुढे उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात यमुना नदीला जाऊन मिळते. बेटवा ही नदी मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातून उगम पावते आणि उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे यमुनेला मिळते. या प्रकल्पामध्ये केन नदीवर धरण बांधण्यात येणार आहे. यामध्येच २२१ किलोमीटर लांबीच्या कालव्याद्वारे पाणी बेटवा नदीपर्यंत पोहोचवले जाणार आहे. हा प्रकल्प अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात २००२ मध्ये आणण्यात आला होता, परंतु प्रशासकीय अडचणी व पर्यावरणीय समस्यांमुळे तो पुर्ण होऊ शकला नाही. नंतर पुढे मोदी सरकारने २०१४ मध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरु केला.

या प्रकल्पासाठी एकूण ४४,६०५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचा फायदा मध्य प्रदेशातील १० जिल्ह्यांतील एकूण ४४ लाख लोकांना तर, उत्तर प्रदेशातील ४ जिल्ह्यातील एकूण २१ लाख लोकांना होणार आहे. यामुळे या भागातील पाण्याचे प्रश्न सुटणार आहेत. यासोबतच विकासाच्या व उद्योगाच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. एकूण ६५ लाख लोक या प्रकल्पाचा लाभ घेणार आहेत. विशेष म्हणजे दीर्घकाळ दुष्काळाशी लढणाऱ्या झाशीतील बुंदेलखंड या प्रदेशाला जीवनदायी सुविधा प्राप्त होणार आहेत. या भागाला या नदीजोड प्रकल्पामुळे समृध्दीचे दिवस पाहायला मिळणार आहेत.

Powered By Sangraha 9.0