मुंबई : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत आदर्श राजकारण काय असते ते दाखवून दिले, असे प्रतिपादन भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केले. बुधवार, २५ डिसेंबर रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सन्मान सप्ताहनिमित्त कांदिवली (पूर्व) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रविण दरेकर म्हणाले की, "राजकारणात आदर्श घ्यावीत अशी काही निवडक व्यक्तिमत्व आहेत. त्यात अटलबिहारी वाजपेयी यांनी ध्येयाप्रती कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सर्वाना सोबत घेऊन आदर्श राजकारण काय असते ते त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत आणि पक्षाचे नेतृत्व करताना दाखवून दिले. वाजपेयी यांची कार्यसंपदा, साहित्य मोठे होते. राजकारणात त्यांनी घालून दिलेले आदर्श आणि पाळेमुळे कुणालाही विसरता येणार नाहीत."
हे वाचलंत का? - काँग्रेसने 'या' दोन गोष्टींसाठी माफी मागावी! मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल
"तसेच गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईत विकास करत असताना अशा काही गोष्टी उभ्या केल्यात त्या चिरकाळ टिकणाऱ्या आहेत. शताब्दी येथे उभारलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे येथे उभारलेले स्मारक. हे स्मारक जर नसते तर कुठल्यातरी हॉलमध्ये फोटो लावून वाजपेयी यांची जयंती साजरी करावी लागली असती. एका कल्पकतेने, थोरपुरुषांचे आदर्श, त्यांच्या स्मृती चिरंतर ठेवण्याचे काम गोपाळ शेट्टी यांनी केले," असे म्हणत दरेकरांनी गोपाळ शेट्टी यांचे आभार मानले.