मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20 Dec 2024 15:25:30
Kalyan

नागपूर : कल्याण ( Kalyan ) येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. २० डिसेंबर रोजी विधानपरिषदेत दिली.

कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद आमदार अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम २८९ अन्वये चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, कल्याण येथील एका सोसायटी अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले आहे. शुक्ला हा एमटीडीसी चा कर्मचारी असून त्याला निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे.

महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्याने येथे देशभरातील टॅलेंट येथे येत असते आणि ते येथे शांततेने राहतात. उत्तर प्रदेशातून आलेले अनेक मराठी भाषा उत्तम पणे बोलतात, अनेक मराठी सण साजरे करतात. मात्र, अशा काही लोकांमुळे या सामाजिक सलोख्याला गालबोट लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एखाद्याला काय खायचे याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

देशातील वैविध्य टिकले पाहिजे, आपली जबाबदारी आहे. क्षेत्रिय अस्मिता म्हणजे मराठी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यावर घाला घातल्यास सहन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

Powered By Sangraha 9.0