चेन्नई : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत ( Bipin Rawat ) आणि त्यांची पत्नी मधुलिका तसेच त्यांच्यासोबत असलेले १२ लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचे कारण 'मानवी चूक' होती. ८ डिसेंबर २०२१ रोजी हा अपघात घडून आला होता. जनरल रावत यांचा मृत्यू झालेल्या हेलिकॉप्टरची चौकशी करणाऱ्या संसद समितीने आपल्या अहवालादरम्यान मानवी चूकीमुळे हा अपघात घडून आल्याचे कारण दिले आहे.
८ डिसेंबर २०२१ रोजी MI17v5 हे हेलिकॉप्टर जनरल रावत व त्यांच्या पत्नीसमवेत १२ लष्करी अधिकाऱ्यांना घेऊन तामिळनाडूच्या कोयंबटूर येथील सुलूर वायूसेना येथून निघाले होते. ते हेलिकॉप्टर वेलिंगटन येथील रक्षा सेवा स्टाफ महाविद्यालय येथे जाणार होते. मात्र उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच कुन्नूरजवळच्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टर कोसळले.
या दुर्घटनेत बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत तसेच त्यांच्या सोबत असलेल्या ११ अधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यातील शौर्य चक्र विजेता ग्रुपचे कॅप्टन वरुण सिंह हे एकटे या अपघातामध्ये वाचले होते. ते गंभीर जखमी झाले होते. नंतर पुढील सात दिवसात उपचारादरम्यान त्यांनाही मरण आले. या अपघातावर होत असलेल्या चौकशीत एका मानवी चुकीमुळे एवढा मोठा अपघात घडून आल्याचे निदर्शनात आले आहे.