खानिवडे : वसईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ८११ हेक्टर जागेत कांदळवन ( Kandalwan ) क्षेत्र आढळून आले आहे. हे क्षेत्र आता कांदळवन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या भागाची खातरजमा करून कांदळवन ताब्यात घेतले जाणार आहे. कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार करण्यात आला आहे.
वसई-विरारमध्ये खाडीकिनारे, पाणथळ जागा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. यामध्ये काही कांदळवन क्षेत्र हे महसूल विभागाच्या अखत्यारित येते. पर्यावरणीय दृष्टीने ही कांदळवने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, तर कांदळवनांमध्ये विविध प्रकारचे पशू-पक्षी आश्रयाला येत असतात. मात्र, मागील काही वर्षांपासून वसई तालुक्यातील कांदळवनाची कत्तल करून अनधिकृत बांधकामे उभारणे, बेसुमार वाळू उपसा करणे, माती भराव करणे सुरू आहे. त्यामुळे खाडीकिनार्याच्या भागातील कांदळवन क्षेत्र कमी होत आहे.
या कांदळवनांची कत्तल व संवर्धनासाठी स्वतंत्र असा कांदळवन विभाग आहे. त्यांच्या मार्फत विविध उपक्रम राबवून कांदळवन क्षेत्राचे संवर्धन केले जात आहे. जे कांदळवन क्षेत्र महसूल विभागाकडे येते, ते कांदळवन विभागाकडे वर्ग केल्यास स्वतंत्र लक्ष ठेवून कत्तली विरोधात कारवाई व संवर्धनासाठी उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. कांदळवन क्षेत्र वर्ग करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव दिला आहे. कोणत्या भागात किती कांदळवन क्षेत्र आहे, याचा आढावा घेतला जात आहे. नुकत्याच केलेल्या पाहणी दरम्यान ८११ हेक्टर क्षेत्रात कांदळवन असल्याचे आढळून आले आहे. लवकरच उपविभागीय अधिकार्यांची भेट घेऊन हा प्रश्न सोडविला जाणार असल्याचे कांदळवन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकार्यांनी सांगितले.
कांदळवन कत्तलीचे प्रमाण वाढले
वसई-विरार शहरात शासकीय खाजण व पाणथळ जागेतील अतिक्रमण वाढीस लागले आहे. त्यावर असलेल्या कांदळवनांच्या वृक्षांची कत्तल करून त्यावर चाळी उभारणे, असे प्रकार घडत आहेत. यावर वेळीच आवर घालण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले. कांदळवन नष्ट झाले, तर विविध प्रजातीच्या पशु-पक्षांचा अधिवास धोक्यात येईल.
महसूल विभागातर्फे १३ गुन्हे दाखल
वसईच्या महसूल विभागाने अतिक्रमण करणार्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी नायगाव, ससूनवघर, जूचंद्र, शिरगाव, नारिंगी अशा विविध ठिकाणच्या भागात अतिक्रमण करणार्यांवर गुन्हे दाखल केले होते. वर्षभरात १३ गुन्हे दाखल झाले आहेत. अजूनही दहा तक्रारी उपविभागीय कार्यालयात दाखल केल्या आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
कांदळवन कक्षाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवून कांदळवनांचे संवर्धन केले जात आहे. याशिवाय कांदळवन क्षेत्राचा आढावा घेऊन ते ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.
सागर आरडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग