नागपूर : (CM Devendra Fadanavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणानंतर बोलताना विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देत चांगलेच सुनावले आहे. यावेळी बोलताना त्यांनी मागील ५ वर्षांमध्ये त्यांच्यावर केलेल्या व्यक्तीगत टीका - टिप्पणीसाठी टीकाकारांचे कान उपटले आहेत.
"माझ्यावर व्यक्तीगत टीका करणाऱ्यांचेही आभार!"
"खरंतर गेली ५ वर्षे महाराष्ट्रासाठी अत्यंत संक्रमणाची वर्षे होती. ज्या प्रकारचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत आपल्यापैकी कुणीही अनुभवले नसतील. मला तर असं वाटतं की गेल्या पाच वर्षांमध्ये २०१९ ते २०२४ व्यक्तिगत मला आणि कुटुंबाला ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं, हा तर कदाचित महाराष्ट्रातील रेकॉर्ड असेल सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पाच - पाच, सात - सात लोकं केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात. पण त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांनी जे वातावरण खराब केलं, त्यांनी जे मला सातत्याने टार्गेट केलं, त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली. कारण ५ वर्षांचे माझे काम त्यांनी पाहिले होते. ५ वर्ष जाती-धर्मांचा विचार न करता सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अश्या प्रकारचे काम मी केलं होतं", असे मुख्यमंत्री म्हणाले.