नागपूर : फेरीवाले आणि नौदल समुद्रात वाट्टेल त्या ठिकाणी बोटी चालवतात. त्यामुळे त्यांना मार्ग ठरवून द्यावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत केली. बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात झाला. दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे प्रश्न उपस्थित केला.
याबद्दल बोलताना मंदा म्हात्रे म्हणाल्या की, "ज्यावेळी फेऱ्या वाढतात त्यावेळी फेरीवाल्या बोटी आणि नौदल बोटी या दोन्ही बोटी त्यांना जिथून मार्ग दिला आहे तिथून न जाता समुद्रात वाट्टेल त्या ठिकाणी फेरी बोट चालवतात. बोटीमध्ये वाट्टेल तेवढे प्रवाशी भरतात. करंज्यापासून तर उरणपर्यंत आणि उरणपासून तर मुंबईपर्यंतच्या सगळ्या मच्छिमारांची लाखों रुपयांची जाळी फाटली जाते. त्यामुळे याबाबतची चौकशी करताना फेरीवाल्या बोटी किती प्रवाशी नेऊ शकतात याची चौकशी झाली पाहिजे."
"नौदलवाले आता सांगतात की, इंजिन आहे म्हणून आम्ही अशी बोट फिरवली. पण यांचे हे नेहमीचेच आहे. मच्छिमार आपला जीव मुठीत घेऊन मासेमारी करतात. त्यामुळे या सगळ्याची चौकशी होऊन दोन्ही बोटींना मार्ग ठरवून द्यावे," अशी मागणी त्यांनी केली आहे.