गोवामुक्ती गाथा : एक सिंहावलोकन

18 Dec 2024 21:33:38
 
Goa Liberation
 
 गोव्यावरील पोर्तुगीजांची साडेचारशे वर्षांची जुलूमी, अन्यायकारक राजवट उलथवून भारतीय सैन्याने दि. 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्याला पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त केले. गोव्याच्या या मुक्तीसंग्रामात केवळ स्थानिक नव्हे, तर देशभरातील स्वातंत्र्यसेनानी सामील झाले. कित्येकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यानिमित्ताने गोवामुक्ती गाथेचे सिंहावलोकन...
 
 
दि . 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. आसेतू हिमाचल हिंदुस्थानात सर्वत्र आनंदाला उधाण आले होते. सर्वत्र दिव्यांची रोषणाई, तिरंग्याचे अनावरण करून लोक उत्साहाने नाचत गात रस्तोरस्ती फिरत होते. पण, त्याचबरोबर 450 वर्षे पोर्तुगीजांच्या गुलामगिरीमध्ये असलेले आपले गोमन्तक बंधु-भगिनी पारतंत्र्यात राहून हालअपेष्टांचे जीवन जगत होते. सरदार वल्लभभाई पटेल संरक्षणमंत्री होते. त्यांनी जुनागढ, हैदराबाद आणि काश्मीर येथे सैनिक कारवाई करून त्यांना हिंदुस्थानात सामील करून घेतले. परंतु, गोवा विलीन व्हायला स्वातंत्र्यानंतर तब्बल 14 वर्षांचा काळ जावा लागला.
 
इ. स. 1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोवा आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी आदिलशहाचे सरदार गोव्यावर अमल चालवित होते. परंतु, आपल्या सैनिकी बळावर हजारो सैनिकांना ठार करून पोर्तुगीज अधिकारी अल्बूकर्क याने मुस्लीम सरदारांना पिटाळून लावले. गोवा, दमण, दीव याबरोबरच अंजदिव बेटावरही त्यांनी ताबा मिळविला. धर्म, व्यापार-उदिम आणि राज्यविस्तार हे तीन हेतू समोर ठेवून पोर्तुगीज गोव्यात आले. अशिक्षित, अडाणी, शेतकामनी गोमन्तकीय जनतेवर ताबा मिळविणे त्यांना सोपे होते. इथली हिंदू देवळे आणि संस्कृती नष्ट करून ख्रिश्चन धर्माचा विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. ठिकठिकाणची मंदिरे उद्ध्वस्त करून चर्चबांधणीसाठी त्यांचे पाद्री लोक व सैनिक गावोगाव फिरू लागले. त्याचवेळी इथले दारिद्र्य, अज्ञान यांचा फायदा घेऊन असाहाय्य जनतेचे मतपरिवर्तन व जबरदस्ती करून धर्मपरिवर्तन करण्याचे षड्यंत्र त्यांनी सुरू केले. शेकडो वर्षांच्या आपल्या पूजनीय देवदेवतांच्या मूर्ती, ग्रंथ घेऊन लोक परप्रांतांना निघून जाऊ लागले.
 
दक्षिण गोव्यात कुंकल्ली येथे एका पाद्रीचा गट पोर्तुगीज सैनिकांच्या संरक्षणात चर्च बांधण्यासाठी परिसराचा शोध घेत होता. चर्च बांधण्यासाठी हे पाद्री लोक देवळे मोडून चर्च बांधणार आहेत. इतर ठिकाणी त्यांनी मंदिरांचा विद्ध्वंस करून आपली प्रार्थनास्थळे उभारली, हे लोकांना माहीत होते. धर्मामिभानी आणि क्षत्रियवृत्तीच्या कुंकल्लीच्या जनतेला हे सहन झाले नाही. त्यांनी त्या परिसरात दमदाटी करणार्‍या पाच पाद्रींवर हल्ला करून त्यांना ठार मारले आणि दहशत निर्माण केली. पोर्तुगालमध्ये त्यावेळी सालाझार हुकूमशाही राजवट होती. त्यांनी या घटनेचा वचपा काढण्यासाठी गनिमीकाव्याचा आश्रय घेतला. सरळ चढाई करण्याऐवजी तिथल्या प्रमुख पुढार्‍यांना सामंजस्याची बोलणी करण्यासाठी कुंकल्लीच्या एका प्रार्थना मंदिरात बोलावले आणि तिथे बोलणी चालू असताना 15 लोकांवर सरळ गोळीबार केला. त्यातला एकजण आपली सुटका करून पळण्यात यशस्वी झाला. म्हणून वाचला. पोर्तुगीजांविरुद्ध लढा देऊन उठाव करण्याचा पहिला प्रयत्न कुंकल्लीमध्ये प्रथम झाला, तो दिवस होता दि. 15 जुलै 1983. ‘कुंकल्लीच्या देसायांचा विद्रोह’ म्हणून या हुताम्यांची इतिहासात नोंद आहे.
 
धर्मांतरानंतर ख्रिश्चन झालेल्या येथील स्थानिकांना पोर्तुगीज सरकार उदारतेने वागवत होते. त्यांना जमिनी, चर्चमध्ये अधिकार्‍यांच्या जागा यांची प्रलोभने दिली जात. परंतु, पोर्तुगालमधून आलेले पाद्री लोक इथे पाद्री बनलेल्या स्थानिक धर्मांतरित ख्रिश्चनांचा दुस्वास करीत. त्यांना कमी लेखत. अन्यायाने वागवत. अशाच एका पिंटो नावाच्या फादरने चर्चविरुद्ध विद्रोहाचे हत्यार उपसले. 1767 मध्ये ‘इमासिओ पिंटोचे बंड’ म्हणून इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे.
 
1910 मध्ये पोर्तुगालमध्ये राजकीय क्रांती होऊन राजेशाही संपुष्टात येऊन लोकशाहीप्रणित राज्यव्यवस्था आली. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पोर्तुगालच्या वसाहती होत्या, तिथे उदार धोरण स्वीकारावयाचे ठरले. पोर्तुगीज भाषेला प्राधान्य, ख्रिश्चन धर्माचा प्रसार या आणि अन्य वसाहतवादी दृष्टिकोनात मात्र फारसा बदल झाला नाही. पोर्तुगीज भाषेमधील वार्तापत्रे, मासिके यांना मोकळीक होती, तर अन्य भाषांमध्ये वार्तापत्र छापायला बंदी होती. लग्नाच्या निमंत्रणपत्रिका छापण्यावरही बंदी होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेली बंदी स्वाभिमानी गोमन्तकी यांना सहन झाली नाही. लुईस दी मिनेझिस या तरुणाने ‘हेराल्डो’ नावाचे वार्तापत्र सुरू केले. पोर्तुगीज भाषेतून असले, तरी सरकारविरोधी कृत्यांबद्दल त्यामध्ये वार्तापत्र प्रसिद्धीस देत असत. आपल्याविरुद्ध बातमी देणार्‍या या वृत्तपत्रावर सरकारने बंदी आणली.
 
सत्तरी इलाख्यातील क्षत्रिय वंशाच्या राणे घराण्याने 1912 सालापर्यंत पोर्तुगीज सत्तेविरुद्ध 22 वेळा सशस्त्र लढा दिला. या स्वातंत्र्य संग्रामाला ‘राण्यांचे बंड’ असा चुकीचा अन्वयार्थ लावून त्याचे महत्त्व कमी होऊ नये. तो आत्मसन्मानातून, राष्ट्रभावनेतून, अस्मिता आणि आपली संस्कृती स्वीकारण्यासाठी दिलेला लढा होता. 1891 मध्ये सत्तरी मोकाशातील शेतसारा वाढविण्यात आला. स्त्रियांवर अत्याचार व्हायला लागले. तुळशी वृंदावन घरासमोर उभारण्यात बंदी आली. हे सर्व असह्य झाल्याने क्षत्रिय वृत्तीच्या दीपाजी राणे यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या नाणूस किल्ल्यावर तलवारी, बंदुका घेऊन हल्ला चढविला. याच घरण्यातील कूण्टोबा राणे, दादाजी राणे यांनी लढा चालू ठेवून पोर्तुगीज सत्तेला तह करण्यास भाग पाडले व आपली इनामे, वतने शाबूत ठेवली.
 
1926 साली कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉँग्रेसच्या अधिवेशनात त्रिस्ताव ब्रागांझा यांनी गोवा राष्ट्रीय काँग्रेसला मान्यता देण्याचा ठराव संमत करून घेतला आणि गोमन्तकीय जनतेला आपल्या हक्क आणि अन्यायाविरुद्ध उठाव करण्यासाठी जागे करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले. 1930 साली पोर्तुगीज सरकारने वसाहतवाद कायदा पारित करून घेतला. त्यानुसार पोेर्तुगीज वसाहत ज्या देशांमध्ये आहेत, त्या सर्व वसाहती पोर्तुगालच्या अविभाज्य भाग आहेत, असे समजून कोणत्याही प्रकारच्या सरकारविरोधी मिरवणुका बैठका, वार्तापत्रे यावर बंदी घालण्यात आली.
 
1946 साली भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस समितीमध्ये आपल्या बाणेदार, अभ्यासू आणि विद्वत्तेबद्दल प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी विचारांचे राम मनोहर लोहिया हे काही काळ विश्रांतीसाठी आपले मित्र ज्यूलियो मिनेझीसे यांच्याकडे आले होते. त्यावेळी गोव्यामध्ये चालू असलेल्या दडपशाहीविरुद्ध इथल्या स्थानिकांनी त्यांना माहिती दिली. संतप्त झालेल्या डॉ. लोहिया यांनी मडगावच्या मैदानावर जाहीर मेळाव्याला बंदी असतानाही सभेचे आयोजन केले. लोहिया यांचे नाव ऐकून सभेला बंदी असूनही लोकांनी फार मोठी हजेरी लावली. पुरुषोत्तम काकोडकर, ब्रागांझा व इतर कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली. पोर्तुगीज अधिकारी मोंतेरो याने लोहिया यांच्या छातीवर पिस्तुल रोखून जमावबंदीचा कागद दाखवला. परंतु, एका हाताने पिस्तुलाचा हात बाजूला करून लोहिया यांनी भाषण सुरुच ठेवले. उपस्थितांनी ‘जय हिंद’चा नारा चालू ठेवला. घोषणांनी मैदान दुमदुमून गेले. तो दिवस होता, दि. 18 जून 1946. आज ते मैदान ‘लोहिया मैदान’ म्हणून प्रसिद्ध आहे. याचवेळी ब्रागांझा, टी. बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष्मीकांत भेमरे यांना पोर्तुगालच्या तुरुंगात बंदीवान करण्यात आले. या सभेने गोमन्तकीय जनतेला धर्म, राष्ट्रभावना, स्वाभिमान, राष्ट्रवाद म्हणजे काय याची जाणीव करून दिली. आपण उठाव करू शकतो, आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, हे कळून आले. 1946 सालच्या ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून सत्याग्रह, मोर्चे लहान लहान प्रमाणात सर्व गोवाभर सुरु झाले. 1947 सालच्या भारतीय स्वातंत्र्यानंतर गोवाही मुक्त होईल, असे वाटलेे होते. भारतीय स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीजांनीही गोव्यातून निघून जावे, असा ठराव पोर्तुगीज संसदेत गोव्याचे प्रतिनिधित्व करणारे फ्रोदीयानो डी मेलो यांनी आणला होता. परंतु, तो नामंजूर करण्यात आला.
 
पोर्तुगाल हा ‘नाटो’ या युरोपियन देशांच्या संघटनेचा एक सभासद असल्याने पोर्तुगालच्या गोवा वसाहतीला छुपा पाठिंबा राहिला होता. शिवाय, अमेरिका आणि इंग्लंड यांचाही उघड पाठिंबा पोर्तुगालला होता. ‘कॉमनवेल्थ’ राष्ट्रांमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी ‘पंचशील तत्त्व’ मान्य केले होते. तसेच, कोणत्याही राष्ट्रावर हिंसात्मक मार्गाने शस्त्र वापरून अधिकार सांगणार नाही, हे तत्त्व असल्यामुळेच गोवामुक्तीला 14 वर्षे इतका प्रदीर्घ काळ लागला.
 
गोवामुक्ती चळवळीला चालना देण्यासाठी लढा उभारणारे विविध पक्ष, संघटना, गट निर्माण झाले. त्यामध्ये ‘अज्ञात गोमन्तक दल’, ‘गोवा मुक्ती सेना’, ‘गोवा विमोचन साहाय्यक समिती’, ‘युनायटेड फ्रंट’, ‘चले जाव गोवा’सारखे गट कार्यरत होते. या सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे लढा द्यावा, असे महात्मा गांधी यांचे मत होते. भारतीय स्वातंत्र्यानंतर झालेली महात्मा गांधींची हत्या, पाकिस्तान देशाची निर्मिती, निर्वासितांचा प्रश्न, हैदराबाद संस्थान, जुनागढ संस्थानचे विलीनीकरण, काश्मीर प्रश्न यामध्येच दंग असलेल्या भारत सरकार आणि विविध पक्षीय संघटनांचे गोवा प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले, यात शंका नाही. परंतु, याच वेळी विद्रोही कार्यामध्ये गुंतल्याने डॉ. पी. डी. गायतोंडे यांना कारावास झाला. लिस्बनच्या तुरुंगातून सुटल्यावर त्यांनी विविध देशांमध्ये जाऊन गोवा विमोचन, पोर्तुगाल सत्तेची दडपशाही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांत जाऊन व्याख्याने दिली. त्रिस्ताव ब्रागांझा यांनीही परदेशी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून जनजागृती केली. अनंत काकबा प्रियोळकर यांसारख्या इतिहास संशोधकाने ग्रंथरुपाने गोव्याची संस्कृती आणि भारतीय, मराठी संस्कृती यांचा पूर्वेतिहास, प्रादेशिक अस्मिता यांसारख्या विषयांवर गोवा हे राज्य हिंदुस्थानशी भाषा, परंपरा, संस्कृती, वंश यांनी कसे जोडले आहे, यासंबधी संशोधनपर लेख लिहून जनजागृती केली. म्हणूनच गुजरात, पंजाब, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र इथे गोवामुक्तीच्या चळवळी उभ्या राहिल्या. गोव्याच्या ‘आझाद गोवा’, ‘मुक्तीसेना’ यांसारख्या संघटनांना बाहेरून भरघोस पाठिंबा मिळाला. भारतीय प्रजा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र आणि गुजरातच्या कार्यकर्त्यांनी, भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी फार मोठे योगदान गोवामुक्तीसाठी दिले आहे. 1955 साली तत्कालीन संघ कार्यकर्ते कर्नाटक केसरी जगन्नाथराव जोशी आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन गोवा सीमेवर सत्याग्रहात उतरले. यात स्त्रिया, मुले यांचा समावेश होता. शांतपणे चालणार्‍या या कार्यकर्त्यांवर लाठीमार, गोळीबार करण्यात आला. कित्येकांचे बळी गेले. 100 वर कार्यकर्ते जखमी झाले.
 
1955 साली झालेला सत्याग्रह अभूतपूर्व होता. कारवार, बेळगाव आणि महाराष्ट्र पत्रादेवी या सीमांमध्ये प्रवेश करून सत्याग्रह शांतपणे करण्याचे ठरले. सत्याग्रहाचे जत्थे एकामागून एक तयार करून घोषणा देत शांतपणे सरहद्दी ओलांडून प्रवेश करीत होते. अचानक गोळीबार सुरू झाला. पत्रादेवी येथे 31 लोकांना गोळ्या लागल्या. त्यामध्ये सहोदरादेवी, कर्नालसिंग बेनिपाल व इतर तरुण वीस-पंचविशीतील तरुण मुले हुतात्मा झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्‍या अमेरिकन-ब्रिटिश वार्ताहरांनी सीमेमध्ये आत प्रवेश करून हुतात्म्यांचे देह अलीकडे आणले. दुसर्‍या ‘किरणपाणी’ सीमेवर तेरेखोल प्रदेशात हिरवे गुरुजी हुतात्मा झाले. तिथे कारवार सीमेवरही गोळीबार होऊन कार्यकर्त्यांचा बळी गेला. यावेळी आंतरराष्ट्रीय ‘युनो’ संघटनेमध्ये पोर्तुगालची नाचक्की झाली. परंतु, निर्लज्ज पोर्तुगाल सरकारने ‘नाटो’ आणि अन्य देशांना आवाहन करून पोर्तुगालच्या सार्वभौमत्वाचा गोव्यात प्रवेश करून सत्याग्रहींनी भंग केला, असा आरोप करून अमेरिका, ब्रिटन यांसारख्या मतलबी देशांचे समर्थन घेतले. युरोपीय देशांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरूंवर दबाव आणला. त्यामुळे सत्याग्रहींना भारत सरकारची मान्यता नव्हती, असे जाहीर करावे लागले.
 
पंतप्रधानांच्या या जाहीर वक्तव्यामुळे त्यावेळी सत्याग्रही चळवळीचे नुकसान झाले. त्यामुळे पुढे सत्याग्रही चळवळी चिरडून टाकण्यास पोर्तुगाल सरकारला बळ आले. डॉ. गायतोंडे, देशांपाडे, मोहन रानडे यांना पोर्तुगालच्या तुरुंगात बंदी करण्यात आले. सांगलीहून शिक्षक म्हणून गोव्यात कार्यरत असलेल्या मोहन रानडे यांचा आझाद गोमन्तक दल’ संघटनेत प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांनी बेती पोलीस स्थानकावर आपल्या कार्यकर्त्यांसह हल्ला केला. या आंदोलनात त्यांना अटक होऊन आठ वर्षांचा लिस्बन येथे तुरुंगात कारावास सहन करावा लागला. 1955 मध्ये शिक्षा ठोठावलेल्या मोहन रानडे यांना गोवामुक्तीनंतरही पोर्तुगाल सरकारने सोडले नाही. त्यासाठी व्हॅटीकन चर्चच्या पोपना विनंती करावी लागली. संगीतकार सुधीर फडके यांना ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन करावी लागली व सरते शेवटी वाजपेयी यांना विरोधी पक्षात असताना लोकसभेत ठराव आणावा लागला व 1969 साली त्यांची सुटका झाली. त्यामुळे गोवामुक्तीच्या आनंद सोहळ्यात या मुक्तीवीराला सहभागी होता आले नाही.
 
गोवामुक्ती लढ्यात महिलाही मागे नव्हत्या. 1946 साली झालेल्या लोहिया मैदानावरील सभेत ‘जय हिंद’ ही घोषणा दिल्याने वत्सला किर्तने या तरुण महिलेला कारावास सहन करावा लागला. ‘चलो चलो गोवा चलो, लाठी गोली खायेंगे, फिर भी गोवा जायेंगे’ अशा घोषणा देत सुधाताई जोशी, कमला उपासनी, प्रभा साठे, शांताराव यांनी लाठीमार, तुरुंगवास सहन केला. अहिंसक मार्गाने चाललेली चळवळ दडपून टाकण्यासाठी पोर्तुगाल सरकारने विश्वनाथ लवंदे, दत्ताराम देशपांडे, बेतू नाईक, तुकाराम काणकोण, जयवंत कुंदे, नारायण नाईक यांना अटक करून तुरुंगात डांबले. ‘गोवा मुक्ती समिती’ स्थापन करून महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते चळवळीमध्ये भाग घेऊन अटक करून घेण्यामध्ये नानासाहेब गोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारीस, महादेश शास्त्री जोशी यांचा सहभाग होता. दक्षिण गोव्यात प्रभाकर वैद्य आणि त्यांच्या सहकार्‍यांनी कुंकल्लीच्या पोलीस स्थानक व आर्मी डेपोवर सशस्त्र हल्ला करून दहशत निर्माण केली. त्याबद्दल त्यांना कारावास झाला. हुतात्मा बापू गवस या पेडणे महालातील वीराला जीपच्या बॉनेटला बांधून फरफटत ओढून नेण्यात आले होते. असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांनी आपले बलिदान गोवामुक्तीसाठी दिले. कोण कुठला 25 वर्षांचा कोवळा कर्नालसिंग पत्रादेवी सीमेवर येतो काय आणि या भूमीवर देह ठेवून हुतात्मा होतो काय! पत्रादेवी नाक्यावर सरकारी प्राथमिक शाळेच्या प्रांगणात त्यांचा छोटेखानी पुतळा त्या संघर्षाची आठवण देत उभा आहे.
 
शेवटी सर्व देशांतून निषेधाचे सूर उमटू लागल्यावर आणि चळवळींना जोर आल्यावर पंतप्रधान नेहरूंनी पोर्तुगाल सरकारला अंतिम इशारा दिला. आता सहनशक्ती संपली! जून 1961 मध्ये पोर्तुगालला आवाहन करण्यात आले. परंतु, प्रतिसाद न दिल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पोर्तुगालच्या अधिकार्‍याने इथल्या गव्हर्नरला इतक्या दूर भारतात लढणे शक्य होणार नाही, युद्ध टाळा, असा सल्ला दिला होता. परंतु, ‘नाटो’चा पाठिंबा मिळून अमेरिका देशाला आवाहन करून भारताला हरवता येईल, अशी गव्हर्नरला आशा होती. अमेरिकेने आपले बलाढ्य ‘सातवे आरमार’ बोटीतून अरबी सागरात आणले होते. पण, याचा काही उपयोग न होता दीड दिवसांत पोर्तुगालला शरणागती पत्र देऊन माघार घ्यावी लागली. जाताना मात्र त्या नतद्रष्ट पोर्तुगालने रस्ते, पूल मोडून भारतीय लष्करासमोर अनंत अडचणी निर्माण केल्याच. परंतु, शेवट गोड झाला. गोवा पाशवी शक्तींपासून मुक्त झाला. या दिवशी गोवामुक्तीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणार्‍या तुरुंगात आपली मूल्यवान वर्षे वाया घालवलेल्या त्या असंख्य वीरांना माझी श्रद्धांजली...
 
 
 महाबळेश्वर गोविंद सामंत 
Powered By Sangraha 9.0