बोट दुर्घटनेची सखोल चौकशी होणार :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

18 Dec 2024 22:31:04

devendra fadanvis


मुंबई, दि.१८ : प्रतिनिधी 
नीलकमल बोट दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय नौदल, कोस्टगार्ड आणि मुंबई पोलिसांसह जिल्हा प्रशासनाकडून बचावकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेची राज्य सरकार आणि भारतीय नौदलाकडून सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच, प्रवासी क्षमतेहून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटीच्या मालकावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

दरम्यान, नागपूर येथे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्टगार्ड, मुंबई पोलिस यांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. या बचावकार्यात नौदलाचे ११ क्राफ्ट आणि ४ हेलिकॉफ्टर्सची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरुच आहे. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल. मृतांमध्ये १० प्रवाशी आणि तीन नेव्ही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या अपघातात दोन गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी अंतिम नसून, यामध्ये अद्याप कुणी बेपत्ता असेल किंवा मृत असेल त्याची माहिती गुरुवारी सकाळपर्यंत मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कसा झाला अपघात ? 

नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होते. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0