
मुंबई : राज्यघटनेनुसार भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. मात्र सद्यस्थितीत सरकारने केवळ एका समाजाची, म्हणजे हिंदूंचीच धार्मिक स्थळे नियंत्रणात घेतली आहेत. कायदा सर्वांना समान असावा. त्यामुळे केवळ हिंदूंचीच नव्हे, तर अन्य धर्मियांची धार्मिक स्थळेही नियंत्रणात आणण्याविषयी सरकारने विचार करावा, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवार, दिनांक १७ डिसेंबर रोजी दिले.
‘श्रीसिद्धीविनायक गणपती मंदर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, १९८०’ सुधारणा विधेयक विधानसभेत संमत करतांना अध्यक्ष नार्वेकर यांनी सरकारला वरील निर्देश दिले. या वेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, ‘‘व्यवस्थापन योग्य व्हावे, यासाठी मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आणण्यात आली आहेत. हा नियम सर्व धर्मियांसाठी लागू असायला हवा. सध्या मात्र हा नियम केवळ हिंदूंसाठी लागू करून केवळ हिंदूंचीच धार्मिक स्थळे कह्यात घेण्यात आल्याविषयी समाजात विचारणा केली जात आहे. याविषयी सरकारने विचार करावा.’’
बांगलादेशी घुसखोर मुक्त महाराष्ट्र करा - आमदार तामिल सेल्वन
गेल्या २ महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत. हिंदूमुक्त बांगलादेश करण्याचा त्यांचा डाव आहे. भारतात मात्र घुसखोर बांगलादेशी मोठ्या प्रमाणात रहात आहेत. हिंदूंवर अत्याचार करणार्या बांगलादेशला धडा शिकवण्यासाठी भारत बांगलादेशी घुसखोरमुक्त करावा, असे आवाहन भाजपचे आमदार तामिल सेल्वन यांनी विधानसभेत केले. अनन्वित अत्याचारांमुळे मागील २ महिन्यांत बांगलादेशातील २ सहस्र कुटुंबांना घरदार सोडून निघून जावे लागले. मुंबईतही बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडे भारतीय ओळखपत्र नाही. अशांना भारताबाहेर हाकलायला हवे. बांगलादेशी घुसखोरमुक्त भारत करायला हवा, असे या वेळी आमदार सेल्वन म्हणाले.