मुंबई : मुंबईतील बेस्ट बसच्या ( Best Bus ) अपघाताची घटना गंभीर असून, राज्य शासनाने याची दखल घेतली आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना राबविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, दि. १६ डिसेंबर रोजी दिली.
विधानपरिषदेत नियम २८९ अन्वये आमदार सुनील शिंदे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्री बोलत होते. फडणवीस म्हणाले की, ‘बेस्ट’ बसच्या अपघातातील वाहनचालकाची तपासणी केली आहे. या घटनेनंतर यादृच्छिक (रॅन्डम) पद्धतीने तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. बेस्टमध्ये नवीन बसेस घेण्यासाठी १ हजार ३०० बसेसची मागणी नोंदविण्यात आली असून, त्या लवकरच बस ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार आहेत. बेस्ट बसेसची वस्तुस्थिती जाणून घेऊन उपाययोजना राबविण्यासंदर्भात मुंबई महापालिका आयुक्तांना ‘बेस्ट’ प्रमुखांशी चर्चा करून आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.