नागपूर : (Chhagan Bhujbal) मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांना राज्यसभेत पाठवले जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र आपण राज्यसभेवर जाणार नाही, असे भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. "आता राज्यसभेवर जाणं म्हणजे मतदारसंघातील मतदारांशी प्रतारणा केल्यासारखं होईल", असं भुजबळ म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले भुजबळ
यावेळी बोलताना भुजबळ यांनी म्हंटलं की, ७-८ दिवसांपूर्वी मला राज्यसभेवर जा, असं पक्षाकडून सांगण्यात आले. मी पूर्वी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होतो. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर आता मी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक नाही, असं मी पक्षाला स्पष्टपणे कळवलं आहे. मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी निवडून दिलं आहे. मग आता मी जर राज्यसभेवर गेलो, तर ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे. लोकसभेच्या वेळी देखील भुजबळ यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र त्यावेळी पक्षाकडून त्यांना संधी मिळाली नाही. तेव्हाही ते काहीसे नाराज झाले होते. यावेळी देखील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भुजबळ यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशात त्यांनी आपली नाराजी उघडपणे सांगितली आहे.
"जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं..."
पक्षश्रेष्ठींकडून त्यांना योग्य ती दुसरी जबाबदारी दिली जाईल, त्यांचा मान ठेवला जाईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र आता भुजबळ यांनी ज्या प्रकारे राज्यसभेवर जाण्यास नकार दिला आहे. तसंच "जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं..", असं सूचक विधानही त्यांनी शेवटी केल्यामुळे भुजबळ आता पुढे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे. दरम्यान नागपूरातील अधिवेशन सोडून भुजबळ तातडीने नाशिकला रवाना झाले.