रत्नागिरी : बांगलादेशात ( Bangladesh ) हिंदू व अल्पसंख्याकांवर घडत असलेल्या अत्याचाराविरोधात आता संपूर्ण भारत आवाज उठवत आहे. राष्ट्रीय मानव अधिकार दिनाच्या निमित्ताने जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे विश्व हिंदू परिषदेने बांगलादेशात घडणाऱ्या घटनेप्रकरणाविरोधात मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये रत्नागिरी शिवसेना आमदार उदय सामंत उपस्थित होते. त्यांनी बांगलादेशात भारतीय अल्पसंख्यांकांवर जो अन्याय होत आहे तो निषेधार्ह असल्याचे सांगून केंद्रसरकारकडे बांगलादेशची परिस्थिती पाकिस्तानसारखी करण्याची मागणी केली.
राष्ट्रीय मानव अधिकार दिनाच्या निमित्ताने मंगळवार दि. १० डिसेंबर रोजी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर राज्याराज्यात निदर्शने होत आहेत. प्रत्येक ठिकाणी आंदोलने, मुक मोर्चे काढून या गोष्टीचा निषेध करण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेने धरणे आंदोलन केले आहे. यामध्ये बांगलादेश करत असलेल्या अत्याचाराचा निषेध केले गेला. याठिकाणी शिवसेना आमदार उदय सामंतदेखील उपस्थित होते. "हे आंदोलन हे केवळ बांगलादेशातील हिंदूंच्या अस्तित्वाचे आंदोलन नसून ते आपल्यादेखील अस्तित्वाचे आंदोलन असल्याचे," उदय सामंत यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, "भारत देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर पाकिस्तानने भारताकडे डोळे वटारुन पाहण्याची हिंमतसुद्धा केली नाही, तशाच पद्धतीची परिस्थिती बांगलादेशचीदेखील करावी अशी मागणी या आंदोलनामार्फत केंद्रसरकारकडे करतो."