बुलढाणा : टीपू सुलतान यांची बुलढाणा येथे नुकतीच जयंती पार पडली. या जयंतीत दोन गटांमध्ये राडा झाल्याची बातमी एका वृत्तमाध्यमांनी दिली आहे. जिल्ह्याच्या धाड गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती साजरी करत असताना दोन गटांमध्ये मोठा राडा झाला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जयंतीवेळी दोन्ही गटांमध्ये दगडफेक करण्यात आली होती.
याप्रकरणात आता १५ जण अटकेत आल्याची माहिती वृत्तमाध्यमाने दिली आहे. यामुळे धाड गावामध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाळपोळ झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
यावेळी घटनास्थळी गदारोळ माजला होता. बुलढाणा जिल्ह्यातील असंतोषाची लाट पसरली. काही भागांमध्ये या घडलेल्या घटनेचा विपरीत परिणाम झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सध्या शांततेचे वातावरण असून पोलीस आपली चोख भूमिका बजावत आहेत.