सद्वस्तू, परब्रह्म यासंबंधी विचार करताना, ते निर्गुण निराकार आहे. ब्रह्मदेवादी देवांचा आधार आहे, त्यांचा ऊर्जास्रोत आहे, असे स्वामींनी श्लोक क्रमांक १४८ मध्ये सांगितले आहे. सद्वस्तू एकमेव असल्याने, त्यासारखी दुसरी वस्तू दाखवता येत नाही. नित्याच्या व्यवहारात आपण साधारणपणे कोणतीही दृश्यवस्तू तिच्या आकारावरुन व गुणावरुन ओळखतो. तशी आपल्या मनाला सवय झालेली असते. तसे पाहिले तर आकाश, ऊर्जा, वीज, उष्णता यांनाही आकार नसतो. पण, त्यांना सद्वस्तूचा दर्जा देता येत नाही. कारण, वीज, उष्णता हे जरी निराकार असले, तरी निर्गुण नाही. त्यांना वहनासाठी माध्यमाची जरुरी असते. सद्वस्तू या सार्यांना ऊर्जा प्रदान करते. विवेकाच्या साहाय्याने सद्वस्तूशी तदाकार होता येते, असे स्वामींचे मत आहे. स्वामी पुढे म्हणतात की, सद्वस्तू आपल्या ‘चर्मचक्षूं’नी पाहाता येत नाही. त्यासाठी ‘ज्ञानचक्षू’ हवे असतात. तथापि, त्यातील मौज अशी की, ज्ञानचक्षूंनी सद्वस्तू पाहू गेले असता, पाहणारा व पाहणे सारेच ब्रह्मरुप झाल्याने, तेथे सद्वस्तूशिवाय काहीच शिल्लक उरत नाही.
स्वामी तर्कशास्त्रसिद्धातांद्वारा ब्रह्मसाक्षात्कारविषयक मते मांडतात. ब्रह्मसाक्षात्कारासाठी साधक योग, ज्ञान, भक्ती इत्यादी मार्गांचा अवलंब करतात. कोणत्याही मार्गाने अंतिम ध्येय गाठता येते. तथापि, स्वामींच्या विचारात योग, ज्ञान, भक्ती या मार्गांचा सुरेख संगम झालेला आढळतो. स्वामींचा सारा भर विवेकावर आहे. हितकारक ते स्वीकारायचे व अहितकारी ते समजून घेऊन, मग त्याचा त्याग करायचा हा स्वामींचा विवेक आहे. योगमार्गसाधनेत नामस्मरणात चित्त एकाग्र झाले तर सुंगध येणे, मंजूळ ध्वनी ऐकू येणे, रंग दर्शन, दुसर्याच्या मनातील विचार ओळखता येणे, इत्यादी क्रिया अनुभवता येतात. लोक त्यांना सिद्धी म्हणतात. अध्यात्मसाधनेत आपण योग्य मार्गावर आहोत, हे दाखवणारी ती चिन्हे असतात. लोक सिद्धीधारकांना ब्रह्मज्ञानी समजतात. ते मात्र बरोबर नाही. सिद्धी साधकाला आकर्षित करतात, हे खरे आहे. खरा साधक त्यात अडकून न राहता, साधना पुढे चालू ठेवतो. सद्वस्तूची अनुभूती आली, तरी साधक साधना बंद करीत नाही. साधनामार्गात वर सांगितलेले अथवा भिन्न ऐन्द्रिक अनुभव येतात, हे खरे आहे. त्यात कल्पनेचा भाग नाही. काही भोंदू साधू त्यांचे अतिरिक्त वर्णन करुन, भोळ्या भाविकांना फसवतात. तथापि, त्यामुळे खर्या साधकांचे अनुभव खोटे ठरवता येत नाहीत. साधना मार्गात येणार्या सुगंध, मंजूळ ध्वनिनाद, रंगदर्शन या सिद्धींपैकी रंग म्हणजे ब्रह्मदर्शन नाही, ब्रह्माला रंग नसतो, सदवस्तू गुणरहित असते, असे स्वामी पुढील श्लोकात सांगतात.
नसे पीत ना श्वेत ना शाम कांहीं।
नसे व्यक्त आवेक्त ना नीळ नाहीं।
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।
मना संत आनंत शोधूनि पाहे॥१५०॥
योगसाधनेत जरी काही आकर्षक रंगांचा साक्षात्कार होत असला, तरी सद्वस्तू पिवळी नाही, पांढरी नाही, श्यामवर्णी नाही अथवा निळ्या रंगाची नाही. दृश्य जगात रंगांना वेगवेगळे अर्थ किंवा भाव असले तरी, सद्वस्तूच्या ठिकाणी रंग संभवत नाही. प्रा. के. वि. बेलसरे यांनी रंगांबाबत लिहिले आहे की, ‘सत्वगुणाचा रंग पांढरा, सत्वप्रधान रजोगुणाचा (शुद्ध रजोगुणाचा) रंग पिवळा, शबल रजोगुणाचा रंग तांबडा आणि तमोगुणाचा रंग काळा असे वर्णन आढळते.’ योगक्रियेत रंगांचे वेगवेगळे विश्लेषण आढळते. ज्ञानसाधनेतील ध्यानात आणि भक्तिमार्गातील नामस्मरण तल्लीनतेत, रंगांचे वेगळे अनुभव साधकाला येत असतात. मुळात स्वामींची भूमिका समन्वयात्मक असल्याने योगशास्त्र, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग यावर स्वतंत्रपणे भाष्य न करता, विवेकाधिष्ठित विचारांवर भर देऊन स्वामींनी सर्व मार्ग एकत्र आणले. वस्तुतः स्वामींनी तिन्ही मार्गांत पारांगतता मिळवली होती. परंतु, विवेकाचा पुरस्कार केल्याने, त्यांचे विचार आपल्यासारख्या सामान्यांसाठी समजायला, आचरायला सोपे झाले. साधनकाळात रंग दिसणे म्हणजे, ब्रह्मज्ञानप्राप्ती ही सामान्यजनांच्या मनातील समजूत स्वामींनी काढून टाकली. ब्रह्म पिवळे, पांढरे, निळे नाही, असे सांगून योगसिद्धींच्या अद्भुततेतून स्वामींनी लोकांना बाहेर काढले.
जनमानसात रंग दिसणार्या अद्भुत सिद्धींबद्दल विशेष औत्सुक्य आहे. योगशास्त्रात अभ्यासकांना अनेक सिद्धी मिळतात. सिद्धी प्राप्त होणे ही सद्वस्तूची ओळख नव्हे, म्हणून ब्रह्माला रंग नसतो, असे स्वामी म्हणाले. हठयोगाच्या साधनेत, रंगाला महत्त्व आहे. त्यांच्या मते, मानवी शरीरात ७२ हजार नाड्या आहेत. त्यांपैकी इडा, पिंगला व सुषुम्ना या नाड्यांना हठयोगात विशेेष स्थान दिलेले आढळते. या नाड्या पाठीच्या कण्यातून म्हणजे मेरुदंडातून, मस्तकावरील सहस्त्राधार चक्रापर्यंत जातात. हठयोगात क्रियायोग व कुंडलिनी योग यांचा समावेश आहे. कुंडलिनीशक्ती गुदस्थानाच्या वर नाभीच्या खालील प्रदेशात निद्रावस्थेत स्थित असते.
ज्ञानेश्वरांनी कुंडलिनीचे वर्णन ‘नागिणीचे पिलू कुंकुमे नहाले’ असे केले आहे. तिथे मन एकाग्र केले, तर कोवळा लालरंग दिसू लागतो. योगासनांच्या अभ्यासाने, कुंडलिनीशक्ती जागृत होऊन ती सुषुम्ना नाडीतून ऊर्ध्व प्रवास करते, असे योगशास्त्रात सांगितले आहे. या मार्गातील सहा चक्रांचे रंग शास्त्रात असे सांगितले आहेत. १) मुलाधार चक्र - रंग लाल असून, केंद्रस्थानी पिवळा. तेथे कुंडलिनीचा निवास. २) स्वाधिष्ठान चक्र - मेरुदंडाच्या मुळाशी-रंग लाल-मध्यभागी पांढरा ३) मणिपूर चक्र - रंग चमकदार पिवळा-केंद्राजवळ लाल. ४) अनाहत चक्र - हृदय रेषेत पाठीमागे मेरुदंडात-रंग निळा ५) विशुद्ध चक्र - तेथे चित्त एकाग्र केले, तर पांढरा रंग दिसतो. ६) आज्ञा चक्र - भूमध्यावर तेथे ज्योतीचे दर्शन होते. योगसाधनेत कुंडलिनीच्या प्रवासात त्या त्या चक्रांचे रंग प्रत्ययास येतात, असे सांगितले जाते. स्वामींच्या मते सद्वस्तूला यांपैकी कोणताही रंग नसल्याने, रंग दिसणे म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार झाला, असे नव्हे.
सद्वस्तूचा अभ्यास करताना मन बाह्य विषयांकडून काढून, भगवंताकडे वळवावे लागते. भगवंत सद्वस्तू सूक्ष्मातिसूक्ष्म असल्याने, त्याचा विचार करताना मन, बुद्धी सूक्ष्म होऊ लागतात. सूक्ष्म मनाला सुवास, रंग, नाद यांची अनुभूती येऊ लागते. या बाबतीत भक्तांचे योग्यांचे अनुभव वेगवेगळे असतात. हे रंग, नाद मोहक असले, तरी ते अध्यात्माचे ध्येय नव्हे. या अतींद्रिय अनुभवांना मागे सारुन, सद्वस्तूच्या सूक्ष्मत्वाचा अभ्यास चालू ठेवावा लागतो. ब्रह्माचा रंग पिवळा, पांढरा, श्यामवर्णी अथवा निळा नाही. संत आपल्याला त्या अभ्यासाची दिशा सांगतात. सर्व फलांची आशा सोडून केवळ सद्वस्तूचा ध्यास घेतल्यास, ब्रह्मदर्शन होते. ब्रह्म व्यक्त आणि अव्यक्त यांच्याही पलीकडे असते. त्यामुळे संतांनी सांगितलेल्या मार्गावर पूर्ण विश्वास ठेवून अभ्यास, साधना चालू ठेवल्यास अखंड समाधानाची स्थिती अनुभवता येते, हीच मुक्ती होय. ही मुक्ती अनुभवास आणून देणार्या, संत आनंत यांना शोधिले पाहिजे. हे मना, तू हा शोध घे. येथे ‘मना संत आनंत शोधूनि पाहे’ ही शेवटची ओळ असलेल्या श्लोक गटाचा शेवट होतो. या पुढील श्लोकात स्वामी एका वेगळ्या विषयाला सुरुवात करणार आहेत. याचे विवरण पुढील श्लोकांतून पाहाता येईल.
सुरेश जाखडी
७७३८७७८३२२