मुंबई : ( Sharad Pawar ) “मी जातीयवाद केल्याचे एक उदाहरण दाखवा,” असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि मविआचे शिल्पकार शरद पवार यांनी नुकतेच दिले होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवारांनी जातीयवादी राजकारणाने महाराष्ट्राचे समाजमन कलुषित केल्याची टीका एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना, शरद पवारांनी दि. २ नोव्हेंबर रोजी बारामती येथे पत्रकार परिषदेत मी जातीयवादी राजकारण केल्याची उदाहरणे देण्याचे आव्हान दिले होते. त्यामुळे दै. ‘मुंबई तरुण भारत’ने पवारांचे हे आव्हान स्वीकारत, शरद पवार यांच्या अशाच काही जातीयवादी विधानांचा धांडोळा घेतला आहे.
भाजपने कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना २०१६ साली राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते. या घटनेवर भाष्य करताना “इतिहासात छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत होते, त्यानंतर पेशवे फडणीसांची नेमणूक करत होते. मात्र, फडणीसांनी छत्रपतींची नेमणूक केल्याचे मी पाहिले नव्हते,” असे शरद पवार यांनी म्हटले होते. ‘छत्रपती’, ‘पेशवे’, ‘फडणीस’ या सगळ्यांच्या मागे असलेला पवारांचा जातीयवादी राजकारणाचा डाव लपून राहिलेला नाही. याविषयी मे महिन्यात बोलतानाच भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “जरांगे बामणी कावा वगैरे म्हणतात ते त्यांचं वक्तव्य सोडून द्या, ते नवीन आहेत. पण, जे राजकारणात वरिष्ठ आहेत, ते लोकसुद्धा असेच वागतात. शरद पवारांसारखा माणूसही माझ्या जातीवर जातो.”
पवारांच्या जातीयवादी भूमिकांचे असेच आणखीन एक उदाहरण देता येईल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दि. १ मे १९७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर इथे श्रीशिवराज्यभिषेक दिनानिमित्त भव्य ‘शिवसृष्टी’ उभारली होती. त्यावेळी या ‘शिवसृष्टी’ला भेट देऊन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कौतुक करणारा संदेशही शरद पवारांनी त्यावेळी लिहिला होता. तसेच अनेकदा शिवशाहिरांच्या कार्याचे कौतुकदेखील शरद पवारांनी केले. मात्र, नंतर जेम्स लेन या पाश्चात्त्य लेखकाच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर बाबासाहेब पुरंदरे यांनीच दिल्याचे कारण पुढे करून, शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर विविध व्यासपीठांवरुन टीकास्त्र डागले. “बाबासाहेब पुरंदरे यांच्याइतका शिवाजी महाराजांवर इतर कोणीही अन्याय केला नाही,” असे म्हणत आजवरच्या बाबासाहेब पुरंदरेंच्या कार्याचा अपमान केला.
शिवशाहिरांच्या कार्याचे कौतुक करणारी शरद पवारांची वाणी आता बाबासाहेबांना खोटे पसरवण्यास कारणीभूत मानू लागली होती. मात्र, सत्य असे की, जेम्स लेन याचे वादग्रस्त पुस्तक प्रकाशित होताच, त्यातील वादग्रस्त मजकूर वगळण्यासाठी सर्वप्रथम प्रकाशकांशी पत्रव्यवहार करणार्यांमध्ये बाबासाहेब पुरंदरे आघाडीवर होते. तसेच, जेम्स लेन यानेही नंतर त्या वादग्रस्त पुस्तकलेखनासाठी बाबासाहेब पुरंदरे त्याच्या माहितीचा स्रोत नसल्याचा कबुलीजबाबदेखील दिला होता. मात्र, त्यानंतरही शरद पवारांनी कधीही जाहीर सभेत पुरंदरेंविषयी केलेली वादग्रस्त वक्तव्ये मागे घेतली नाहीत. उलटपक्षी, ब्राह्मण समाज शिवछत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड करीत असल्याचा अपप्रचार समाजात हळूवारपणे पसरवण्यासाठी अशा खोट्या कथानकाचा पवारांनी खुबीने वापर केला.
त्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्या आजवरच्या जवळपास ६० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत केवळ जातीवाचक विधानेच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतूनही जातीयवादाला खतपाणी घातल्याचे स्पष्ट व्हावे.
शरद पवारांच्या जातीयवादी विधानांचे हे घ्या पुरावे!
पुण्यातील राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात बोलताना “यापुढे पक्षाच्या कार्यक्रमात ‘टिळक पगडी’ न देता, महात्मा फुले यांचीच पगडी सत्कार म्हणून देण्यात यावी,” असे फर्मानदेखील शरद पवारांनी काढले होते. वास्तविक कार्याचा गौरव म्हणून टिळकांची पगडी दिली जात असे. त्यालाही सोयीस्कर जात पवारांनी चिकटवली.
‘वाजवा तुतारी, हटवा वंजारी’ ही घोषणा २००९ मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच दिली होती.
शरद पवार म्हणाले होते की, “धनंजय मुंडे लहान कुटुंबातला, लहान समाजातला उदयोन्मुख तरुण होता, म्हणून विरोधी पक्षनेता ही जबाबदारी मी दिली.”
शरद पवार म्हणतात, “राजू शेट्टी कोणत्या समाजातून येतात ते पहा. त्यांना इतर जिल्ह्यांत जाऊन दुसर्या समाजाचे साखर कारखाने बंद पाडायचे आहेत, पण स्वतःच्या समाजाचे कारखाने दिसत नाहीत.”
“दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी यांचे शिवाजी महाराजांना घडवण्यात काहीही योगदान नाही,” असा दावादेखील शरद पवारांनी वेळोवेळी केला.
शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरण प्रकरणातूनही दोन समाजांत दीर्घकाळ संघर्ष पेटता ठेवला.