मुंबई : काँग्रेस नेतृत्वहीन असून त्यांचे विचार स्पष्ट नाहीत, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्येंनी केली आहे. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने ईव्हीएम मशीनवर आरोप करण्यात येत आहे. यावर आता केशव उपाध्येंनी आपल्या 'X' अकाऊंटवरून त्यांना प्रत्युत्तर दिले.
केशव उपाध्ये म्हणाले की, "एकदा ईव्हीएम हॅक केलं आहे म्हणायचं आणि एकदा मतदानाच्या टक्केवारीवर आक्षेप घ्यायचा. काँग्रेस नेतृत्वहीन आहे. विचार स्पष्ट नाहीत. लोकांमध्ये जाऊन कामं केली नाहीत. खोटं बोलून एकदा मतं मिळवली पण सारखी मिळवता येत नाहीत, हे ओळखणारा नेता त्यांच्याकडे आहे का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "भरकटलेल्या विचारधारा घेऊन महाविकास आघाडीच्या भरकटलेल्या नावेत बसून ईव्हीएमवर टीका करण्यात काय अर्थ आहे? ज्या ईव्हीएमने झारखंडमध्ये जिंकवलं, ते ईव्हीएम चांगले आणि महाराष्ट्रात हरले की, ते ईव्हीएम वाईट? नाना पटोले आणि संजय राऊत कधी तरी गंभीर व्हा आणि जनमताचा आदर करा," असेही केशव उपाध्ये म्हणाले.