महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येणार

20 Nov 2024 14:22:57
Voting
 
नागपूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथील मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला. कामठीचे मतदार विजयी करणार असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे ( Mahayuti ) सरकार येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
श्री बावनकुळे यांनी पत्नी सौ ज्योती, मुलगा संकेत, स्नुषा अनुष्का आणि मुलगी पायल यांच्यासह मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना श्री बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेच्या विकासाचा जाहीरनामा आम्ही पूर्ण करणार आहोत. पुढील पाच वर्षे कामठीच्या जनतेची कामे करण्याचा संकल्प केला करताना कामठीची जनता माझ्यावर विश्वास ठेऊन विजयी करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
बुधवारी सकाळी श्री बावनकुळे कोराडी येथील बुथ क्रमांक २९ वर भाजपाच्या मतदार मदत केंद्रात सामान्य भाजपा कार्यकर्त्यांच्या रूपात पोहचले. बुथवर येणाऱ्या मतदारांचा अनुक्रमांक शोधून देण्यासह मतदानाची प्रक्रिया त्यांनी समजाविली व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. बुथवर असणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांचे कौतुक केले व ही प्रक्रिया दिवसभर सुरू ठेवण्यास सांगितले.
 
अनिल देशमुखांचे बूमरॅंग होणार
 
निवडणूक जिंकण्यासाठी अनिल देशमुख यांना असे काही करावे लागेल, अशी अपेक्षा नव्हती. पोलिसांनी या घटनेचा खुलासा केला आहे. देशमुख यांनी सहानुभूती आणि निवडणूक जिंकण्याकरिता जो खेळ केला आहे, तो खेळ बूमरॅंग झाला आहे. काटोलची जनता चरणसिंग ठाकूर आणि भाजपा-महायुतीला निवडून देईल. विजय किंवा पराजय होणारच पण अनिल देशमुखांनी या वयात असे करू नये. मागील दोन वर्षांपासून ते वेगवेगळ्या पद्धतीने सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Powered By Sangraha 9.0