पवारांनी राज्याला घरफोडीचे राजकारण दाखवले : प्रविण दरेकर

17 Nov 2024 19:11:07
Pravin Darekar

मुंबई : महाराष्ट्राला फोडाफोडीचे राजकारण जर कुणी दाखवले असेल तर ते शरद पवार यांनीच. या राज्यात अनेक पक्ष फोडले, स्वतः नवीन पक्ष काढला, अनेक घराणी फोडली. घरफोडीचे राजकारण पवारांनीच महाराष्ट्राला दाखवलेय. वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राला विचार दिला त्यांच्या बरोबर राहून पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पवारांनी केले. ज्यांनी आपले आयुष्य खंजीर खुपसण्यात घालवले त्यांनी दुसऱ्याला गद्दार न बोललेले बरे, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना दरेकर काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी केलेल्या विधानावर म्हणाले की, काँग्रेसच्या मनात बाबासाहेबांविषयी किंवा दलित समाजाविषयी सातत्याने आकसच राहिलेला आहे. त्यांच्या रक्तात, विचारात बाबासाहेबांचा द्वेष होता. बाबासाहेब उभे असताना त्यांना पराभूत करण्याचे काम याच काँग्रेसने केले. त्यामुळे जे पोटात असते तेच ओठात येते. काँग्रेसला मतांसाठी दलित समाज, बाबासाहेब लागतात. परंतु बाबासाहेबांचे विचार नको आणि समाजाच्या उत्कर्षासाठी काही करायलाही नको हा काँग्रेसचा खरा चेहरा आहे.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, जय भवानी, जय शिवाजी आपल्या वचननाम्यात आणून उपयोग नाही, आचरणात आणायला लागते. छत्रपती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक त्यांचे विचार सोडलात, बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट वरुन जनाब करण्यापर्यंत काँग्रेसला साथ दिलात. उद्धव ठाकरेंची नौटंकी आज सर्वांना कळतेय. निवडणूक आयोगानेही अशा प्रकारची भुमिका घेतली असावी. फडणवीस म्हणाले ते महाराष्ट्र, धर्म युद्ध आहे. देशहितासाठी प्रेरित झालेले फडणवीस यांचे वक्तव्य आहे.

तसेच गेल्यावेळी युतीचे सरकार जनतेने निवडून दिले होते. सत्तेसाठी जिहाद कुणी केला? सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. सत्ताजिहाद तुमच्या रक्तात भिनला. सत्तेसाठी नितिमूल्य पायदळी तुडवताना ठाकरे दिसताहेत असेही दरेकर म्हणाले.

अजित पवार यांच्या विधानावर दरेकर म्हणाले की, लोकशाहीत आपण जनतेच्या मताला महत्व देतो. त्याचपद्धतीने निवडून आलेल्या आमदारांनाही त्या पक्षाच्या नेत्याचे ऐकावे लागते. त्यामुळे अजित पवारांचे म्हणणे खरे आहे की, आमदारांची कामे होत नव्हती. आमदार अस्वस्थ होते. अशावेळी ज्या कारणासाठी निवडणुका लढवतो, गरिबाच्या कल्याणासाठी, विकासासाठी तो होत नसेल तर अर्थ काय? त्या भूमिकेतून अजित पवारांनी निर्णय घेतला हे खरे आहे.

शरद पवारांच्या विधानावर दरेकर म्हणाले की, ४०-५० वर्ष काँग्रेसचे राज्य होते. पवारांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली सरकार चालले. चार वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते मग आता सांगताय मी सांगेन त्याला मतदान करा नोकऱ्या देईन. याचा अर्थ ४०-५० वर्ष काय केलात? बारामतीच्या पुढे उद्योगधंदे नेऊ शकला नाहीत. बारामती म्हणजे राज्य समजलात. जनतेला माहित आहे दोन वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणावर उद्योग राज्यात आलेत. देशातील जवळपास ५२ टक्के गुंतवणूक येथे आलीय. बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे, उद्योग आणण्याचे काम आमची महायुती करणार आहे. तुम्हाला ४०-४५ वर्ष जे जमले नाही ते आम्ही प्रामाणिकपणे करू, असा टोलाही दरेकरांनी लगावला.

संजय राऊत स्वार्थी वृत्तीचे

गुजराती भांडवलदारांच्या जीवावर पोसलेले संजय राऊत यांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासा. किती गुजराती, बंगाली उद्योगपतींशी त्यांचा संबंध आहे आणि त्यांचा लाभ ते उठवताहेत. केवळ मीडियासमोर बोलायचे आणि आतून त्यांच्याशी साटेलोटे करायचे. स्वार्थी वृत्ती संजय राऊत यांची असल्याचे दरेकर म्हणाले.

Powered By Sangraha 9.0